माणगावात उद्यापासून आमरण उपोषणास; विविध संघटना, लोकप्रतिनिधींचा जाहीर पाठिंबा
महामार्गाचे काम रखडल्याने कोकणचा विकास खुंटला : समृद्ध कोकण संघटना अध्यक्ष संजय यादवराव
सलीम शेख
माणगाव : १७ वर्ष रखडलेल्या कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या बहुचर्चित मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत महामार्ग जनआक्रोश समिती आक्रमक झाली असून माणगावात नवीन बसस्थानक याठिकाणी हि समिती गुरुवार, दि. १५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १० वाजल्यापासून समितीचे अध्यक्ष अजय यादव, सचिव रुपेश दर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली आमरण उपोषणास बसणार असल्याची माहिती या समितीला जाहीर पाठिंबा देणारे स्वराज्यभूमी आंदोलन व समृद्ध कोकण संघटना अध्यक्ष संजय यादवराव यांनी बुधवार, दि. १४ ऑगस्ट रोजी माणगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली. या आंदोलनास समितीला कुणबी समाज समन्वय समिती रायगड जिल्हा, माणगाव व्यापारी असोसिएशन, रिक्षा संघटना माणगाव, रामनवमी उत्सव समिती, मावळा प्रतिष्ठान, बजरंग दल यांच्यासह विविध संघटना, लोकप्रतिनिधींचा जाहीर पाठिंबा असून जिव्हाळ्याच्या या प्रश्नाबाबत कोकणवासियांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आमरण उपोषणाच्या माध्यमातून होणाऱ्या आंदोलनास पाठिंबा द्यावा असे आव्हान केले. या पत्रकार परिषदेला संजय यादवराव यांच्या समवेत माणगाव नगरीचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार,जनआक्रोश समितीचे सुरेंद्र पवार,संजय जंगम आदी उपस्थित होते. या आमरण उपोषणास आपलाही पाठिंबा असल्याचे रिक्षा संघटनेचे माणगाव तालुकाध्यक्ष संजयआण्णा साबळे यांनी सांगितले.

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना संजय यादवराव पुढे म्हणाले कि, समृद्धी महामार्गाचे काम पाच वर्षांत झाले परंतु १७ वर्ष होऊनही मुंबई – गोवा महामार्गाचे काम रखडल्याने कोकणचा विकास खुंटला आहे. चीन बॉर्डरसाठी हिमालयातील रस्ते केले, मात्र कोकणातून जाणारा मुंबई – गोवा महामार्गाचे काम १७ वर्षे होऊन देखील पूर्ण होत नाही. या महामार्गावर अनेक अपघात होऊन अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत तर अनेकांना अपंगत्व आले आहे. या महामार्गाच्या कामाकडे राज्यकर्ते गांभीर्याने लक्ष देत नाहीत. माणगाव, इंदापूर बायपासच्या कामाचा तिढा अद्याप सुटलेला नाही.परशुरामाला मातीचा डोंगर आहे. राज्यकर्ते कोल्हापूर मार्गे तुम्ही कोकणला जा तुम्हाला टोल मोफत करू असे सांगितले जाते. आम्हाला आमच्या प्रदेशात येण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून यावे लागते यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. या रस्त्याचे काम रखडल्याने पर्यटनावर त्याचा परिणाम होऊन विकासही थांबला आहे. या महामार्गावरील सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक वळणे यामध्ये आवश्यक ते बदल करायला हवेत. या कामासाठी नेमण्यात आलेल्या ठेकेदारांना हजारो कोटी रुपये देण्यात आलेले आहेत. या मार्गावर झाडे लावण्याची तरतूद असून एकही झाड लावण्यात आलेले नाही. प्रत्येक गावात असंख्य अडचणी या महामार्गामुळे निर्माण झाल्या आहेत. धरण बांधल्यासारखे महामार्ग बांधल्याने दरवर्षी पूर येत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांची ही स्वराज्यभूमी आहे. भारताला लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वासुदेव बळवंत फडके, विनोबा भावे, महर्षी कर्वे यांच्या सारखे राष्ट्रपुरुष कोकणाने दिले. कोकणची ही स्वराज्यभूमी प्रेरणा देणारी केंद्र बनवीत म्हणजे येणाऱ्या पर्यटकांना कोकणच्या सौंदर्याचा परिपूर्ण आनंद घेता येईल. या तऱ्हेने राज्यकर्त्यांनी काम करून कोकणचे सौंदर्य जपायला हवे. यासाठी मुंबई-गोवा महामार्ग याचे काम चांगल्या प्रकारे व लवकरात होणे गरजेचे आहे. मात्र त्याकडे राज्यकर्ते तेवढ्या गांभीर्याने घेत नसल्याचे कोकण वासीयांच्या लक्षात आल्याने आता कोकणी लोकांची सहनशीलता संपली असून कोकणी जनतेने व तरुणांनी आपल्या हक्कासाठी ही लोक चळवळ हाती घेतली आहे. या प्रश्नासाठी समन्वयक म्हणून जनआक्रोश समिती यांनी पुढाकार घेतला असून या समितीला या जिव्हाळ्याच्या प्रश्नाबाबत विविध संघटना,लोकप्रतिनिधी यांनी जाहीर पाठिंबा दिला असून जोपर्यंत सरकार या कामाबाबत ठोस आश्वासन देत नाहीत तो पर्यंत हे आमरण उपोषण सुरु राहील असे समीतीतर्फे सांगण्यात आले.