मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी जम्मू्-काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यातील निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले. या घोषणेमुळे हे स्पष्ट झाले आहे की महाराष्ट्रातील निवडणुका निश्चित ठरलेल्या वेळेत म्हणजे दिवाळीत होतील. राज्यातील सर्व पक्ष आणि महायुती तसेच महाविकास आघाडी निवडणुकीच्या तयारीला लागले असताना एक ओपिनियन पोल समोर आले आहे ज्यात राज्यात आज निवडणुका झाल्यास कोणाची सत्ता येईल? त्याच बरोबर कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
टाइम्स नाऊ नवभारत आणि मॅटराइज यांनी केलेल्या सर्व्हेमध्ये महाराष्ट्रात कोणत्या पक्षाचे सरकार येऊ शकते आणि प्रत्येक पक्षाला किती जागा आणि किती टक्के मते मिळतील याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ओपिनियन पोलमध्ये लोकांना विचारण्यात आले होते की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काम कसे आहे? ३५ टक्के लोकांनी खुप चांगले काम असल्याचे उत्तर दिले आहे. २१ टक्के लोकांनी सरासरी तर ३० टक्के लोकांनी चांगले नाही असे मत नोंदवले आहे. १४ टक्के लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या कामावर काही प्रतिक्रिया दिलेली नाही.
कोणाला किती जागा
टाइम्स नाऊ नवभारत आणि मॅटराइजच्या ओपिनियन पोल राज्यातील विधानसभेच्या २८८ जागा आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी १४५ जागांची गरज लागते.
पक्ष | जागा |
भाजप | ९५ ते १०५ |
शिवसेना (शिंदे) | १९ ते २४ |
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) | ७ ते १२ |
काँग्रेस | ४२ ते ४७ |
शिवसेना (उद्धव ठाकरे) | २६ ते ३१ |
राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) | २३ ते २८ |
अन्य | ११ ते १६ |
ओपिनियन पोलमध्ये राज्यातील ४० ते ४२ जागा अशा आहेत ज्यावर चुरशीची लढत होणार आहे. त्यामुळे या जागांवर कोणाचा विजय होईल हे सांगणे अवघड आहे.
भाजपची २०१९ सारखी स्थिती
ओपिनियन पोलनुसार भाजपला २०१९ मध्ये मिळालेल्या जागा पुन्हा मिळण्याची शक्यता आहे. आज निवडणुका झाल्यास भाजपला ९५ ते १०५ जागा मिळतील. सर्वाधिक जागा भाजपला मिळणार असल्या तरी बहुमतासाठी त्यांना अन्य पक्षांची मदत लागले. गेल्या निवडणुकीत शिवसेनेसह त्यांनी १६१ जागा जिंकल्या होत्या. भाजपला १०५ तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या होत्या. तेव्हा भाजपने १५६ जागांवर निवडणुक लढवली होती. आता यावेळी देखील त्यांना इतक्याच जागांवर निवडणूक लढवावी लागले.
ओपिनियन पोलमध्ये लोकांना हा देखील प्रश्न विचारण्यात आला की महाविकास आघाडी की महायुती यापैकी कोणामध्ये अधिक समन्वय आहे. त्यावर ३३ टक्के लोकांनी महायुती असे उत्तर दिले. २६ टक्के लोकांच्या मते महाविकास आघाडीमध्ये चांगले समन्वय आहे. १४ टक्के लोकांनी दोघांच्या पारड्यात मते टाकली. १२ टक्के लोकांच्या मते दोन्ही आघाडींमध्ये समन्वय नाही. १५ टक्के लोकांनी कोणताही पर्याय निवडला नाही.