पथदिवे नसल्यामुळे चोरीचे प्रमाण वाढले, अपघाताचाही धोका
विश्वास निकम
कोलाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ ला जोडणारा कोलाड-रोहा राष्ट्रीय मार्गाच्या दोन्ही बाजूंनी पथदिवे बसविण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी मार्किंग केली आहे. परंतु अद्याप या मार्किंगला पोल सुद्धा बसविले नसल्याने दिवे लागणे दूरच राहीले. यामुळे या मार्गावर अंधार असल्यामुळे चोरीचे प्रकार तसेच अपघाताचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येत आहे.
कोलाड-रोहा मार्गावर धाटाव औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे या मार्गावर सतत वाहनांची वर्दळ सुरु असते. दुसऱ्या पाळीतील सुटणारे कामगार तसेच रात्रपाळीसाठी जाणारे कामगार यांची दुचाकीवरून येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या ही मोठया प्रमाणात असुन या मार्गाच्या बाजूला काही ठिकाणी मोठ मोठी झाडे आहेत. शिवाय या मार्गाच्या रस्त्याचे काम अतिशय उत्तम प्रकारचे झाले आहे. यामुळे या मार्गावर सुसाट जाणाऱ्या वाहनांमुळे अपघात होऊ नये म्हणून रस्त्याला जागोजागी गतिरोधक बसविले आहेत. परंतु, या रस्त्यावर अंधार असल्यामुळे वाहने दिसत नाहीत. परिणामी अनेकवेळा या मार्गावर अपघात होत आहेत.
कोलाड-रोहा मार्गावर पथदिवे नसल्यामुळे चोरीच्या प्रमाणात देखील वाढ झाली असुन, या मार्गावरून एक महिन्यांपूर्वी मिथुन जैन यांची १३ हजार रुपयांची सायकल, तर पाच दिवसापूर्वी आंबेवाडी येथील रामदास लोखंडे यांच्या पानटपरीतुन रोख रक्कम व माल चोरीला गेला होता. पालेखुर्द येथील टपरी फोडून माल चोरीला गेला गेल्याचीही घटना घडली होती. याला मुख्य कारण म्हणजे या मार्गावर पथदिवे नसल्यामुळे अंधाराचा फायदा घेत चोरी होत असुन लवकरात लवकर या मार्गावर पथदिवे बसविण्यात यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
कोलाड-रोहा मार्गावर अंधाराचा फायदा घेत चोरीचे प्रकार वाढले आहेत. यामुळे व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी पथदिवे बसविण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी खड्डे खोदून विद्युत पोल उभे करण्यासाठी सिमेंटची मार्किंग करून ठेवली आहे. परंतु, अद्याप पथदिवे बसविण्याचे काम सुरु झाले नाही. यामुळे अंधाराचा फायदा घेत या परिसरात चोरीचे प्रकार घडत आहेत. हे थांबण्यासाठी येत्या गणेश उत्सवापूर्वी या मार्गावर पथदिवे बसविण्यात यावे.
-रामदास लोखंडे,
सामाजिक कार्यकर्ते.