• Sat. Jun 28th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महाड तालुक्यात खोडकिडा रोगामुळे भात पीक संकटात!

ByEditor

Aug 17, 2024

पाच वर्षात सहा हेक्टर जमीन शेतकऱ्यांकडून लागवडी विना पडीक

मिलिंद माने
महाड :
रायगड जिल्ह्यातून मागील आठवडाभरापासून पाऊस गायब झाला असून उन्हाळ्यासारखे पडणाऱ्या तीव्र उन्हामुळे भातपीक संकटात आली आहेत आहे. महाडसह जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पावसामुळे भातशेती उत्तम बहरली आहे. कृषी खात्याने शेतीत पडणाऱ्या रोगाबाबत सर्वेक्षण चालू केले असून अनेक ठिकाणी खोडकिडा या रोगाचा पादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले असून वेळीच शेतकऱ्यांनी यावर उपाययोजना केली नाहीतर मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होण्याची शक्यता असून हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कोकणात मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते, मात्र ही शेती पावसावर अवलंबून असते. यंदा जूनच्या सुरवातीपासूनच संपूर्ण कोकणात दमदार पाऊस लागला. वेळेत शेतीची लागवड झाली. त्यामुळे भात पीक उत्तम पद्धतीने बहरलं आहे. मात्र, मागील आठ दिवसापासून रायगड जिल्ह्यामधून पाऊस गायब झाला आहे. काही दिवसातच भातशेती पसवण्यास सुरवात होणार आहे. अशावेळी महाड तालुक्यात कृषी विभागामार्फत १६ ऑगस्ट २०२४ रोजी प्राध्यापक जीवन आरेकर, कृषी विज्ञान केंद्र रोहा, किरण कोकरे कृषी पर्यवेक्षक महाड व त्यांच्या समवेत दत्तात्रय नरुटे, पल्लवी कानडे, अनुसया बडे, मुग्धा पिंजरकर, बजरंग दाबेकर यांनी संयुक्तपणे तालुक्यातील चांढवे खुर्द, कांबळे तर्फे महाड, आकले, वडवली, कोल आणि दासगाव या गावांमध्ये किड रोग सर्वेक्षण पाहणी केली. यावेळी त्यांना भातावरील पिवळा खोडकिडा या किडीचा प्रादुर्भाव दिसून आला.

खोड किडा म्हणजे काय?

हा किडा शेतीमध्येच असतो. भात पीक कापणीनंतर हा किडा कोषा अवस्थेत राहतो. दुसऱ्या वर्षाच्या पेरणीनंतर पोषक वातावरण मिळाल्यानंतर यामधून पतंग बाहेर पडून साधारणतः तो किडा दीडशे ते दोनशे अंडी घालून अळ्या तयार झाल्यानंतर भाताच्या खोडात जाऊन कोंब खाण्यास सुरवात करतात. भात वाढीच्या अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास भाताचे मधले पाते पिवळे, लालसर होऊन त्यांची सुरळी होते. याचा भात पिकावर परिणाम होतो. या किडीच्या व्यवस्थापनाकरीता क्विनॉलफॉस २ मिली प्रती लिटर पाण्यातून फवारणी करावी किंवा फिप्रोनील ०.३% दाणेदार किटकनाशक २०८ ग्रॅम प्रतिगुंठा या प्रमाणात जमीनीमध्ये पुरेसा ओलावा असताना वाळूमध्ये किंवा युरीया खतामध्ये मिश्रण करून भात शेतीमध्ये वापरावे.असे आवाहन आरेकर यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना केले आहे.

शेतकरी बांधवांनी खोड किडीचे व्यवस्थापन वेळेत करून होणारे संभाव्य भात शेतीचे नुकसान टाळावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी धीरज तोरणे यांनी शेतकऱ्यांना केले आहे

महाड तालुक्यात शेती व्यवसायात घट

मागील काही वर्षापासून महाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी अनेक कारणांमुळे शेती व्यवसायाकडे पाठ फिरवल्याचे दिसून येते आहे. पाच वर्षापूर्वीची आकडेवारी पाहिली तर तालुक्यात १४ हजार हेक्टरवर भात शेतीची लागवड होत होती. यामध्ये घट होऊन गेल्या वर्षी १० हजारावर आली. यंदा त्यामध्ये ही घट होऊन ८२३० हेक्टर जमिनीवर भात शेतीची लागवड केली गेली आहे. याचा अर्थ पाच वर्षात ६ हजार हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांनी भात लागवड करणे बंद केले आहे. याची कारणे मजुरांची कमतरता, लागवडीसाठी वेळेवर मजूर न मिळणे, पावसाचा अनियमितपणा व भात कापणीच्या वेळेला अतिवृष्टी होऊन पिकाचे होणारे नुकसान, उशिरा होणारी लागवड, उत्पन्नात घट, भात पिकावर दरवर्षी पडणारा रोग, रानटी जंगली डुक्कर आणि माकडांचा होणारा त्रास त्याच बरोबर गावातील तरुण वर्गाचे नोकरीसाठी व उद्योगधंद्यासाठी शहरामध्ये स्थलांतर अशी अनेक कारणे शेती व्यवसाय तोडण्यास कारणीभूत असल्याचे अनेक शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!