घनःश्याम कडू
उरण : उरणमध्ये यशश्री शिंदेच्या हत्येचे वातावरण थंड होण्याच्या आधी जासई येथे खुनाची घटना उघडकीस आली आहे. या घटनेतील आरोपीना उरण पोलिसांनी अवघ्या तीन तासातच अटक करण्यात यश मिळविले आहे. जासई येथील लोकनेते दि. बा. पाटील सभागृहाच्या बाजूला एका प्लास्टिकच्या गोणीमध्ये मृतदेह सापडण्याची घटना शनिवारी घडली.घटनास्थळी उरण पोलिसांनी धाव घेत तपास सुरू केला.
त्यावेळी बालगंधर्व रामचंद्र गोडस (42) आणि दत्तात्रेय महादेव बुटुकडे (40) हे दोघेही विरली सातारा येथील रहिवासी आहेत. एकाच कंपनीत दोघे चालकाचे काम करीत असल्याने त्यांची मैत्रीपूर्ण सबंध होते. तसेच रहाण्यास ही दोघे जासई येथे होते. मैत्रीमुळे त्यांचे घरी जाणेयेणे होते. यातूनच दत्तात्रेय बुटुकडे याचे बालगंधर्व गोडस याच्या पत्नीशी प्रेमसंबंध सुरू झाले. वारंवार सांगूनही सुधारणा होत नसल्याने संतापलेल्या बालगंधर्वने दत्तात्रेय याला शुक्रवारी दि. 16 ऑगस्ट रोजी जेवणाच्या बहाण्याने घरी बोलविले. त्यानंतर दारू प्यायल्यानंतर नशेत वादाला सुरुवात झाल्यानंतर बालगंधर्व याने दत्तात्रेय याच्या डोक्यात दगडी पाटा घालून हत्या केली. दत्तात्रेय मयत झाल्यानंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह प्लास्टिकच्या गोणीत भरून तो दि. बा. पाटील सभागृहालगत असलेल्या अडगळीत टाकून त्यांनी पळ काढला होता.
परंतु, सदरची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांना धागेदोरे मिळाले. अवघ्या तीन तासात पोलिसांनी आरोपी बालगंधर्व व त्याच्या पत्नीला पनवेल बसस्थानक परिसरातून अटक केली. त्यांनी खुनाची कबुली दिल्याची माहिती एसीपी डॉ. विशाल नेहुल यांनी दिली.