घन:श्याम कडू
उरण : तालुक्यातील ग्रामपंचायतचा भ्रष्ट कारभार उघड होताना दिसत आहे. मात्र भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याऐवजी त्यांची पाठराखण वरिष्ठ अधिकारी वर्गाकडून सुरू असल्याची तक्रार उरणच्या जनतेकडून केली जात आहे.
तालुक्यातील अनेक तक्रारदारांनी आपल्या ग्रामपंचायतमधील भ्रष्ट कारभार उघड करण्यासाठी माहितीच्या अधिकारात माहिती मागितली आहे. परंतु ग्रामसेवक त्यांना आपला भ्रष्ट कारभार उघड होऊ नये म्हणून माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसते. मुदत सपल्यानंतर अपील करूनही माहिती दिली जात नाही. याबाबत उरण पंचायत समितीकडे अपील करूनही त्यांच्याकडूनही दखल घेतली जात नाही. उलट तक्रारदारांकडेच पुरावे मागितले जात आहे.
याबाबत काही तक्रारदारांनी मुख्यमंत्री कक्षाकडे दाद मागितल्या नंतर त्या कार्यालयातून चौकशी करून अहवाल मागितला जात असतानाही तो देण्यासही टाळाटाळ केली जात आहे. काही ग्रामपंचायत मधील दप्तर नसल्याचे लेखी देऊनही त्यांचा लेखापरीक्षण अहवाल ओके आला आहे. अशा भ्रष्ट कारभार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश असतानाही उरण पंचायत समितीमधील अधिकारी वर्ग त्याला केराची टोपली दाखवीत असल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी केला आहे.
उरणमधील भ्रष्ट कारभार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर ठोस कारवाई झाली नाहीतर येत्या स्वतंत्र दिनी म्हणजे १५ ऑगस्ट रोजी कोकण आयुक्तालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा तक्रारदारांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केला आहे. याबाबत उरण पंचायत समितीचे अधिकारी वर्ग कारवाई करते की पुन्हा भ्रष्ट कारभार करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पाठराखण करते याकडे उरणच्या जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.