विनायक पाटील
पेण : तालुक्यातील ठाकूरपाडा येथील होतकरू तरुण शंकर गणेश ठाकूर यांनी सोमवार, दि. १९/०८/ २०२४ रोजी सामाजिक जाणीवेतून आपली मुलगी अद्विका हीच्या वाढदिवसानिमित्त पनवेल तालुक्यातील ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्यावतीने चालविल्या जाणाऱ्या बांधनावाडी येथील बालग्राम प्रकल्पातील अनाथ, आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील वंचित बालकांना एक महिन्याचे अन्नधान्यासह गृहोपयोगी साहित्य वाटप केले.

आपण ज्या परिस्थितीतून वर आलो त्या परिस्थितीचे स्मरण म्हणून आणि माझ्या मुलींवरही तसे संस्कार व्हावे यासाठी मी माझ्या कुवतीप्रमाणे मदत करत असल्याचे यावेळी शंकर ठाकूर यांनी सांगितले. मागील दोन वर्षापासून शंकर ठाकूर हे बालग्राममध्ये जाऊन येथील बालकांना अन्नधान्यासह इतर साहित्य वाटप करत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत ग्रामसंवर्धनचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, प्रजापिता ईश्वरीय ब्रह्मा कुमारीजचे अनुयायी किशोर पाटील, सुनीता पाटील, मिलन पाटील, शोभा पाटील, बालग्राम मित्र राजू पाटील, राजेश रसाळ, सतीश मोकल, सचिन पाटील, मानसी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.