रायगड जनोदय ऑनलाईन
निरोगी राहण्यासाठी डॉक्टर अनेकदा दिवसाचे पहिले जेवण अर्थातच निरोगी नाष्टा घेण्याचा सल्ला देतात. जेणेकरून त्या व्यक्तीच्या शरीराला आवश्यक पोषण मिळेल आणि दिवसभर काम करण्याची ऊर्जा त्याच्या शरीरात राहील. त्यासाठी अनेक लोक फळे, ज्यूस, अंडी, असे विविध प्रोटीनयुक्त पदार्थ खात असतात. जेणेकरून प्रोटीनही मिळावे आणि आरोग्यही उत्तम राहावे. परंतु आपणास माहित आहे का की, कधीकधी सकाळी चुकीच्या पद्धतीने केलेला नाष्टा आपल्या आरोग्यास फायदेशीर होण्याऐवजी गंभीर नुकसान करू शकतो. चला जाणून घेऊया अशाच ५ पदार्थांबाबत जे रिकाम्या पोटी खाल्यास तुम्हाला त्रास देऊ शकतात.
आंबा किंवा आंब्याचा रस
आपल्याकडे आंब्याला फळांचा राजा म्हणून संबोधले जाते. आंबा सर्वच वयोगटातील लोकांना खायला आवडते. अत्यंत चविष्ट असण्यासोबतच आंब्यात मुबलक प्रमाणात फायबर, अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि नैसर्गिक साखर असते. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी जास्त प्रमाणात आंबा खाल्ल्याने जास्त प्रमाणात फायबर आणि साखरेमुळे पोटात दुखू शकते. आंब्याचे जास्त सेवन केल्याने व्यक्तीच्या पचनक्रियेवर वाईट परिणाम होतो. ज्यामुळे पोटात सूज येणे आणि गॅसची समस्या वाढू शकते. त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी आंबा खाण्याचे टाळावे.
कांदा
कांदा हा अनेक लोकांना प्रचंड जिव्हाळयाचा प्रश्न असतो. नॉनव्हेज पदार्थांसोबतच शाकाहारी पदार्थांमध्येसुद्धा अनेकजण कांदा खातात. मात्र कांद्याचे काही विपरीत परिणामसुद्धा आहेत. रिपोर्ट्सनुसार, रिकाम्या पोटी कच्चा कांदा खाल्ल्याने पोटात गॅस आणि अॅसिडिटीची समस्या उद्भवू शकते. कारण कांद्यामध्ये असलेले फ्रुक्टोज पचविणे कठीण असते, ज्यामुळे गॅसची समस्या उद्भवते. त्यामुळे शक्यतो कांदा उपाशी पोटी खाणे टाळा.
कॉफी
बहुतांश लोक सकाळी उठल्याबोरबर रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पिऊन दिवसाची सुरुवात करतात. पण कॉफीमध्ये असलेल्या टॅनिनमुळे दिवसभर अॅसिड तयार होतो. ज्यामुळे छातीत जळजळ, गॅसची समस्या आणि पोटातील अॅसिडची पातळी वाढू शकते. त्यामुळे शक्यतो रिकाम्या पोटी कॉफी पिणे टाळावे.
अननस
सकाळी रिकाम्या पोटी अननस खाल्ल्याने पोटात अॅसिडचे प्रमाण वाढू शकते. याशिवाय अननसामध्ये ब्रोमेलेनचे प्रमाणही जास्त असते. ब्रोमेलेन एक मानवी शरीरात निर्माण होणारे द्रव्य आहे जे पोटातील आम्ल पूर्ण करून आतड्याना त्रास देते, ज्यामुळे पोटात हालचाल होते. ज्याने पोट दुखण्याची, फुगण्याची समस्या जाणवू शकते.
टोमॅटो
टोमॅटोमध्ये टॅनिक नावाचे अॅसिड भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे पोटात अॅसिडिटी होऊन आंबट ढेकर येऊ शकतात. जर तुम्हाला आधीच अॅसिडिटीची समस्या असेल तर सकाळी रिकाम्या पोटी टोमॅटो खाऊ नका. याशिवाय टोमॅटोमध्ये असलेली अॅसिडिटी पोटात असलेल्या गॅस्ट्रोइंटेस्टाइनल अॅसिडशी रिअॅक्ट होऊन एक द्रव्य तयार करते ज्यामुळे पोटदुखी, क्रॅम्प्स सारख्या समस्या उद्भवतात. रिकाम्या पोटी टोमॅटो खाल्ल्याने ही मुतखडा होण्याचा धोका वाढतो.