पावसाने गोविंदांमध्ये आणली जान
अमोल पेणकर
रोहे : रोह्यात पारंपारिक पध्दतीने गोकुळाष्टमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. मध्यंतरी काही दिवस दडी मारलेला पाऊस पुन्हा काही दिवसांपासून सक्रिय झाल्याने रोह्यात हलका पाऊस सुरू होता. या पावसाने गोविंदा पथकांमध्ये जान आणली. हा पारंपारिक सण अतिशय आनंदात साजरा झाला. शहरातील तिन्ही प्रमुख आळ्यांमधून गोविंदा निघतो. दुपारनंतर एकामागुन एक असे ठरलेल्या क्रमाने हे गोविंदा रोहे बाजारपेठेत आले. येथिल उंच दहीहंड्या फोडण्यात आल्या. हे क्षण पाहण्यासाठी नागरिकांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केली होती.

रोहे तालुक्यात जवळपास १२४ दहिहंड्यांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये रोहे शहरात सायंकाळी होत असलेली माजी आमदार अनिकेत तटकरे मित्रमंडळाची दहीहंडी स्पर्धा, राममारुती चौकातील शिवसेना ठाकरे गटाची दहीहंडी आणि भाजपाच्या माध्यमातून तीनबत्ती नाका येथे आयोजित केलेली दहीहंडी या उत्सवाचे आकर्षण होत्या. ग्रामीण भागासह रोहे अष्टमी शहरातील विविध आळ्यांमधून गोविंदोत्सव साजरा केला जातो. दुपारनंतर सायंकाळच्या दरम्यान गावातील प्रथे, परंपरेप्रमाणे साईनाथ मित्र मंडळ मोरे आळी, त्यानंतर जय गिरोबा अंधार आळी व रोह्याचा राजा धनगर आळी हि गोविंदा पथके त्या-त्या आळीतील ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शिस्तबध्दतेने एकामागुन एक असे बाजारपेठेत आले. येताना वाटेत विविध ठिकाणी बांधलेल्या दहीहंड्या फोडुन या उत्सवाचा आनंद गोविंदांनी लुटला. गौरोबा नगर दमखाडी येथिल गोविंदा पथक आणि महात्मा फुले नगर, धाविर रोड येथिल संत रोहिदास गोविंदा पथक यांनी मुख्य हमरस्त्यावरील तीन बत्ती नाका पोलिस चौकीपर्यंत येत यादरम्यान बांधण्यात आलेल्या दहीहंड्या फोडुन गोविंदोत्सव साजरा केला. पावसाने गोविंदा पथकांचा उत्साह द्विगुणित केला. तीनबत्ती नाका येथुन पुढे नदीकडे जात गोविंदाची सांगता करण्यात आली. रोहे पोलीस निरीक्षक देविदास मूपडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.