• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पालघर ,रत्नागिरी, कोल्हापूर व भंडारा जिल्ह्यात भाजपा वाढवण्यासाठी भाजपाची व्युव्हरचना

ByEditor

Aug 29, 2024

मिलिंद माने
मुंबई :
राज्यात सत्ताधारी असलेल्या महायुतीमधील भाजपा आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील पालघर, रत्नागिरी, कोल्हापूर व भंडारा या जिल्ह्यात भाजपाचे आमदार निवडून आणण्यासाठी भाजपा पक्षश्रेष्ठी कामाला लागले असून त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व एकनाथ शिंदे यांचा शिवसेना गट या पक्षातील विद्यमान आमदारांचा पत्ता कट करून भाजपा पदाधिकाऱ्यांना कशी उमेदवारी देता येईल याबाबतची रणनीती भाजपाकडून आखली जात असल्याचे या मतदारसंघातील सर्वेक्षणाअंती स्पष्ट होत आहे.

केंद्रात भाजपा सत्तेत आहे, त्याचबरोबर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पाडून महायुतीचे सरकार भाजपाने कूट नीतीचा वापर करून दोन वर्षांपूर्वी राज्यात सत्ता स्थापन केली. प्रथमतः शिवसेनेमध्ये फूट पाडून एकनाथ शिंदे गट भाजपा बरोबर सत्तेत सहभागी करून घेतला व भाजपाचे 106 आमदार असताना देखील 40 आमदार असणाऱ्या शिंदेंना मुख्यमंत्री केले. राज्यात एकनाथ शिंदे बरोबर भाजपा सत्तेत सामील झाल्यानंतर शिवसेना पक्ष फुटीवर सर्वोच्च न्यायालयातील घटनापिठाचा निर्णय विरोधात गेल्यास सरकारवर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पाडली व अजित पवार गटाला बरोबर घेऊन राज्यात सत्तेत सामील केले. मात्र, सत्ता उपभोगून झाल्यानंतर दीड महिन्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा सत्तेत यायचे असल्यास स्वपक्षातीलच आमदार निवडून आणणे गरजेचे असल्याचे भाजपा पक्षश्रेष्ठींच्या सर्वेक्षणाअंती स्पष्ट झाले आहे.

केंद्राबरोबर राज्यात भाजपा सत्तेत असून देखील पक्ष वाढविण्यास मागील चार वर्षात भाजपा कमजोर ठरल्याचे भाजपाने विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून केलेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत याचा अनुभव राज्यातील भाजप नेतृत्वाला आला. त्याची दखल घेऊन भाजपाने विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखण्याचे ठरवले आहे. मात्र, त्यासाठी त्यांना अडचण ठरत आहे ती शिंदे गट व अजित पवार गटातील दिग्गज आमदार यांची. या आमदारांचे विधानसभा निवडणुकीत तिकीट कसे कापता येईल याची रणनीती भाजपा आखत असल्याची चर्चा राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केली जात आहे.

राज्यात भाजपा सत्तेत असताना देखील राज्यातील पालघर, रत्नागिरी, कोल्हापूर व भंडारा या जिल्ह्यात मात्र भाजपाचा एकही आमदार २०१९च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेला नाही. याची खंत भाजपा पक्षश्रेष्ठींसह केंद्रीय नेतृत्वाने याबाबत भाजपाने केलेल्या सर्वेक्षणाअंती निष्कर्ष नोंदविला आहे.

राज्यातील पालघर, रत्नागिरी ,कोल्हापूर व भंडारा या जिल्ह्यातील विद्यमान आमदार कोणत्या पक्षाचे आहेत त्याची नावे पुढीलप्रमाणे;
पालघर जिल्हा : एकूण विधानसभा सदस्य ६
१) पालघर – श्रीनिवास वनगा (शिवसेना)
२) डहाणू – विनोद निकोले (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष)
३) विक्रमगड – सुनील भुसारा (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट)
४) बोईसर – राजेश पाटील (बहुजन विकास आघाडी)
५) नालासोपारा – क्षितिज ठाकूर (बहुजन विकास आघाडी)
६) वसई – हितेंद्र ठाकूर (बहुजन विकास आघाडी)

पालघर जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघात खासदार जरी भाजपाचा असला तरी एकही आमदार या जिल्ह्यात भाजपाचा नसल्याने या जिल्ह्यात भाजपा आमदार निवडून आणण्यासाठी भाजपाला मोठी कसरत करावी लागणार आहे.

रत्नागिरी जिल्हा

या जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघ येतात, मात्र एकही भाजपाचा आमदार 2019 च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आला नाही. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात खासदार नारायण तातू राणे हे भाजपाकडून लोकसभेवर निवडून आले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघापैकी तीन विधानसभा मतदारसंघात रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतिनिधित्व करतात. उरलेल्या दोन विधानसभा मतदारसंघात रायगड लोकसभा मतदारसंघातील खासदार सुनील तटकरे हे प्रतिनिधित्व करतात.

रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचे आमदार आहेत ते पुढील प्रमाणे;

१) रत्नागिरी – उदय शामंत (शिवसेना शिंदे गट)
२) राजापूर – राजन साळवी (शिवसेना उद्धव ठाकरे गट)
३) चिपळूण – शेखर निकम (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट)
४) गुहागर – भास्करराव जाधव – (शिवसेना उद्धव ठाकरे गट)
५) दापोली – योगेश रामदास कदम – (शिवसेना शिंदे गट)

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड या विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करणार असल्याचे संकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोकणचे नेते व खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोकणातील रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात भाजपाला २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार देऊन निवडून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रणनीती आखावी लागणार आहे. त्यातच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे कोकणात भाजपा विरोधात तीव्र असंतोष असून त्यात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील खासदार नारायण राणे व त्यांचे पुत्र निलेश व नितेश यांच्याबाबत असलेली नाराजी देखील भाजपाला विधानसभा निवडणुकीत त्रासदायक ठरणार असल्याचे सर्वेक्षण भाजपा केंद्रीय नेतृत्वाने केलेल्या सर्वेक्षणात स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात देखील भाजपा विधानसभा निवडणुकीत उमेदवार देणार असले तरी निवडून येण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करण्यासाठी मुंबई व ठाणे वाशी भाजपा नेत्यांना कोकणात ठोकून राहावे लागणार आहे

कोल्हापूर जिल्हा

या जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघ येतात, मात्र या जिल्ह्यात देखील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा एकही आमदार निवडून आला नाही यासाठी २०२४ ची विधानसभा निवडणूक भाजपाने या जिल्ह्यासाठी गांभीर्याने घेतली असल्याचे बोलले जात आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ निहाय असलेले आमदार पुढील प्रमाणे;
१) कोल्हापूर दक्षिण – ऋतुराज पाटील (काँग्रेस)
२) चंदगड – राजेश नरसिंह पाटील – (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट)
३) राधानगरी – प्रकाश आबिटकर (शिवसेना शिंदे गट)
४) कागल – हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट)
५) करवीर – पी. एन. पाटील (काँग्रेस – पी. एन. पाटील यांचे निधन झाल्यामुळे सध्या ही जागा रिक्त आहे)
६) शाहुवाडी – विनय कोरे (जनसुराज्य पक्ष)
७) हातकणंगले – राजू आवळे (काँग्रेस)
८) इचलकरंजी – प्रकाश आवाडे (काँग्रेस)
९) शिरोळ – उल्हास पाटील (शिवसेना उद्धव ठाकरे गट)

या जिल्ह्यात खासदार देखील काँग्रेस पक्षाचा असल्याने भाजपाला या ठिकाणी विद्यमान आमदार असणाऱ्या मतदारसंघावर भाजपा आमदार नव्याने निवडून आणण्यासाठी जंग जंग पछाडावे लागणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

भंडारा जिल्हा

भंडारा जिल्हा हा नागपूरपासून केवळ ४० किलोमीटर अंतरावर असून राज्याची उपराजधानी व भाजपाचे दिग्गज नेते नागपूरमध्ये आहेत. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय देखील नागपूरमध्ये आहे. मात्र, भंडारा जिल्ह्यात २०१९च्या विधानसभा निवडणुकीत तिन्ही विधानसभा मतदारसंघांपैकी भाजपला एकही जागा प्राप्त करता आली नाही. तीच परिस्थिती २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत राहण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केली जात आहे.

भंडारा जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघातील सद्यस्थितीतील आमदार;

१) भंडारा – नरेंद्र भोंडेकर (अपक्ष परंतु सध्या एकनाथ शिंदे यांना पाठिंबा)
२) तुमसर – राजेंद्र कारेमोरे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट)
३) साकोली – नाना पटोले (काँग्रेस) हे काँग्रेस पक्षाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष असल्याने या मतदारसंघातील त्यांच्यासह तुमसर व भंडारा या दोन मतदारसंघातील आमदार देखील काँग्रेस पक्षाचे निवडून आणण्यासाठी त्यांनी रणनीती आखल्याचे बोलले जात आहे

एकंदरीत राज्यातील पालघर, रत्नागिरी, कोल्हापूर व भंडारा या तीन जिल्ह्यात सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला यश संपादन करता आले नाही याची खंत राज्यातील भाजप नेतृत्वापासून केंद्रीय नेतृत्वाला आहे. मात्र, राज्यातील मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण यासह नुकतीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याची झालेली दुर्दैवी घटना यामुळे राज्यात भाजपा बॅकफुटवर गेल्याने २०१९च्या विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती २०२४च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात तशीच राहील असे राजकीय निरीक्षकांसह भाजपाच्या सर्वेक्षणाअंती स्पष्ट होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!