बारा वर्ष रखडलेल्या कामांची दखल कोण घेणार?
विश्वास निकम
गोवे-कोलाड : मागील तेरा वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या खड्यांची व्येथा पहिल्याच पावसात भले मोठे खड्डे पडले असुन या खड्ड्यांचा त्रास प्रवाशांसह वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. तर इंदापूर ते पेण दरम्यान ही मोठी समस्या आहे तसेच मागील तीन चार वर्षापूर्वी या मार्गावरील कोलाड येथील कुंडलिका नदीपात्रावर नव्याने पुल उभारले आहेत मात्र त्याचे काम आजतागायत अर्धवट अवस्थेत असून चक्क पुलावरून रहदारी करणाऱ्या पादचाऱ्यांना मोठी तारेवरची कसरत करत जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. याला जबाबदार कोण? असा प्रश्न प्रवासी वर्गाला मागील तेरा वर्षांपासून पडला आहे.
देशात तसेच राज्यात अनेक ठिकाणी नव नवे मार्ग गेली आठ ते दहा वर्षात तयार करण्यात आले. मात्र मुंबईहून कोकणात जाणारा एकमेव मार्ग म्हणून मुंबई गोवा महामार्गाचे काम गेली तेरा वर्ष रखडल्याने अनेकांचे बळी गेले. त्यांचे कुटुंब रस्त्यावर आले. एप्रिल, मे महिन्यांत डांबर टाकण्याचे काम करतात जून, जुलैच्या पावसात त्याची अवस्था गंभीर होत असते. अनेक ठेकेदार आले गेले त्यात अनेक मंत्री याबाबत दौरा देखील करतात अनेकदा नारळ फोडले गेले मात्र कोकणवासियांच्या हाती विकासाच्या बाबतीत निराशा येते याचीच चिंता व्यक्त केली जात आहे.
दरवर्षी गणेशोत्सव जवळ आला की, संबंधित मंत्री, पालकमंत्री आणि नेते मंडळी या रस्त्याची पाहणी करण्याचा फार्स करतात. मुंबई-गोवा महामार्गाची देखावा म्हणून पाहणी करतात आणि पुन्हा माघारी निघून जातात तद्नंतर ठेकेदार थातुरमातुर खड्डे बुजविण्याचे काम करतात. तेही चार दिवसात उखडतात. हाच खेळ गेली अनेक वर्ष सुरू आहे. तर काही ठिकाणी आजही प्रवाश्यांना तारेवरची कसरत करत पावसाळयात प्रवास करावा लागत आहे हे रायगडातील जनतेचे दुर्दैवच म्हणावे लागेल यात शंका नाही.
मार्गावरील कोलाड नाक्यावर पावसाळ्यात आज देखील प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. बस थांब्या जवळच गुडघाभर पाणी साचून राहत आहे तर त्यातून गाडी गेली की त्याचा जलाभिषेक प्रवासी वर्गावर होत आहे. त्याच पाण्यातून प्रवाश्यांना धावत धावत बस पकडावी लागते आहे. त्याचबरोबर कोलाड पुई नदीवरील पुलाचे काम अद्याप रखडलेले आहे. कुंडलीका नदीपत्रावरील पुलाचे बांधकाम अर्धवट अवस्थेत असून पुलाला जोडून बनवला गेलेला पादचारी पूल साईड कट्ट्याविना असल्याने ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना मोठी तारेवरची कसरत करत जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पुलावर देखील खड्ड्यांचे साम्राज असून पाणी साचून राहत आहे.
मागील दोन वर्षांपूर्वी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी इंदापूर ते पनवेल महामार्गाची पाहणी संबधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्या समवेत केली होती. निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत त्यांचा खरपूस समाचार घेत सदरील ठेकेदार यांना सज्जड दम देखील दिला. तद्नंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा देखील दौरा झाला. येत्या वर्षभरात या मार्गाचे काम पूर्ण होईल असे आश्वासन देऊन गडकरी गेले. पुन्हा नव्याने कामाचे भूमीपूजन केंद्रीय मंत्री ना. गडकरी यांनी करत पनवेल ते इंदापूर मार्ग हा काँक्रीटीकरण होणार असल्याचे सांगितले असून आजच्या घडीला अनेक ठेकेदार झाले, वेगवेगळ्या पक्षांचे सरकार आले मात्र कोणाच्या कारकीर्दीत या मार्गाचे काम पूर्ण होईल असा प्रश्न साऱ्यांना पडला आहे.
राज्यात गेली वर्षभर सत्ता संघर्षनाट्य सुरू आहे. कोणकोणत्या पक्षाचा व खात्याचा मंत्री आहे हे सकाळी उठल्यानंतर समजते. राज्याचा मंत्रीमंडळ विस्तार लांबणीवर पडल्याने साराच कारभार खोळंबला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. महागाईने साऱ्यांचे कंबरडे मोडले आहे तर बाजारात विविध वस्तूंचे दर व शैक्षणीक साहित्याचे दर देखील कमालीचे वाढले आहे. माणसाने जगावं कस हेच कोणाला कळत नाही त्यात पाऊस सुरू झाला असून प्रवासही धोक्याचा झाला आहे. मुंबई गोवा महामार्गावर पडलेले जीवघेणे खड्डे प्रवाशी वर्गाच्या जीवावर बेतले आहेत. कोलाड नाक्यावर तर अक्षरशः प्रवाशांची दमछाक होताना दिसत आहे. खोदलेले रस्त्यांचे काम, अर्धवट महामार्ग आणि सर्व्हिस रोड याचे काहीच ताळमेळ नसल्याने मोठी गंभीर समस्या आहे. नाल्यांचे काम अर्धवट तर कोलाड कुंडलिका नदीपात्रावर बनवला गेलेला पुल तसेच त्याला जोडून पादचारी पुल हा अद्याप रखडलेला आहे त्यामुळे यावरून ये जा करणाऱ्या शाळेतील विद्यार्थी व प्रवाशी वर्गाला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून याबाबत संबधित अधिकारी वर्गाने याचा गांभीर्याने विचार करून याबाबत उपाययोजना करण्यात याव्यात.
– दिनकर सानप
सामाजिक कार्यकर्ते