सलीम शेख
माणगाव : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम १३ वर्ष उलटूनही अजून पूर्ण झालेला नाही. या मार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले असून वाहन चालकांना वाहन चालविताना या मागावर तारेवरची कसरत करावी लागत असून सध्या पावसाचे दिवस सुरु असल्याने या खड्यांतून पावसाचे पाणी साचल्याने वाहन चालकांना खड्यांचा अंदाज येत नसल्याने या खड्यांमधून वाहने आपटून अनेकांच्या वाहनांचे नुकसान झाले आहे. या महामार्गावर आजपर्यंत अनेक लहान- मोठे अपघात होऊन अनेकांचे जीव गेले आहेत. या महामार्गाचे काम आतापर्यंत पूर्ण झाले पाहिजे होते. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी आपल्या आमदारांना सोबत घेऊन दि. १४ जुलै २०२३ रोजी या महामार्गाची केलेली पाहणी म्हणजे हि एक प्रकारची केवळ नौटंकी असल्याचा घणाघात अलिबागचे मा. आमदार पंडितशेठ पाटील यांनी प्रसार माध्यमांजवळ बोलताना व्यक्त करून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका केली.
यावेळी प्रसारमाध्यमांजवळ बोलताना मा. आमदार पंडितशेठ पाटील पुढे म्हणाले कि, सध्याचे राजकारण हे स्वार्थाचे राजकारण झाले असून जनतेला कधी वाटले नसेल अशा आघाड्या, युत्या होत आहेत. सत्तेत जाऊन केवळ आपली पोळी भाजून घेण्याचे काम सुरु आहे. जनतेच्या सार्वजनिक हिताच्या प्रश्नाकडे सरकारचे अजिबात लक्ष नाही. माविआ आघाडीतील शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर पुन्हा राज्यात शिंदे- फडणवीस सरकार वर्षभरापूर्वी सत्तेवर आले. आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडून त्यांचे काही आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. आशा प्रकारे कधी न पाहिलेले राजकारण जनतेला पहायला मिळाले. या स्वार्थी राजकारण्यांमुळे जनतेचे प्रश्न खितपत पडले आहेत. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामास १३ वर्षांपूर्वी सुरुवात होऊनही अजूनही ते काम पूर्ण झाले नसून कधी होईल याची देखील शास्वती देता येत नाही. महामार्गावर पळस्पे ते इंदापूर दरम्यान जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. दरवर्षी पावसाळ्यात या महामार्गाची दुरावस्था असते. गणेशोत्सव हा कोकणातील मोठा सण असल्याने या गणेशोत्सव सणाला मोठ्या प्रमाणात मुंबई-पुणे येथून चाकरमानी आपल्या गावी कोकणात येत असतात. या चाकरमान्यांना आपल्या गावी येत असताना दरवर्षी मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांचे विघ्न असते. या महामार्गावरील प्रचंड खड्ड्यांमुळे मुंबईचा ३ तासांचा प्रवास तथा जवळपास ५ तासांचा झाला आहे. महामार्गावरील या खड्ड्यांमुळे जनतेचा वेळ व पैसाही वाया जात असून प्रचंड खड्ड्यांमुळे वाहन चालक व प्रवासी यांच्या शरीराची हाडे खिळखिळीत झाली आहेत.
शासनकर्त्यांनी या जनहितार्थ कामाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंत्रीपदाची शपथ घेऊन जवळपास वर्ष होत आला आहे. तेव्हापासून या रस्त्याच्या कामाकडे त्यांनी गांभीर्यपूर्वक लक्ष दिले असते. तर महामार्गाचा पनवेल ते इंदापूर एक मार्गिका काम आतापर्यंत पूर्ण झाले असते. पावसामुळे खड्डे भरण्याचे काम चांगल्या प्रकारे होत नाही. खड्डे भरले कि, पुन्हा काही दिवसात आहे तीच परिस्थिती होते. याकरिता एखाद्या चांगल्या ठेकेदाराला हे काम देऊन चांगल्या प्रकारे महामार्गावरील खड्डे भरल्यास प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल. परंतु तसे काम गेले अनेक वर्षात होत नसल्यानेच दरवर्षी कोकण वासियांना खड्ड्यांच्या विळख्यातून जावे लागत आहे. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम आतापर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे होते. या महामार्गाच्या नंतर बऱ्याच वर्षांनी सुरु झालेला समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण होऊन तो मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. मात्र मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम केव्हा पूर्ण होईल याच्या विवंचनेत संपूर्ण कोकण वासीय जनता असल्याचे मा. आमदार पंडितशेठ पाटील म्हणाले.