लातूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा कोर्टानं राज ठाकरेंविरोधात अटक वारंट जारी केलंय. 16 वर्षांपूर्वीच्या प्रकरणात त्यांना वॉरंट बजावण्यात आलंय. 16 वर्षापूर्वी मनसे कार्यकर्त्यांनी महामंडळाच्या बसगाडीची तोडफोड आणि जाळपोळ केली होती. त्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे राज ठाकरेंना निलंगा कोर्टात हजर रहावं लागणार आहे. काही वर्षांपूर्वी ते याच प्रकरणी निलंगा कोर्टात हजर झाले होते.
2008 मध्ये निलंगामध्ये मनसे कार्यकर्त्यांनी उदगीर मोडवरती महामंडळाच्या बसगाडीची जाळपोळ केली होती. याप्रकरणी निलंगा पोलिस ठाण्यात 8 जणावर गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये राज ठाकरे यांचा समावेश होता. यापूर्वी निलंगा न्यायालयाने जामीन रद्द केल्याने त्यांना निलंगा येथील न्यायालयात हजर रहावे लागले होते. तसेचम, त्यांच्या वकिलांनी राज ठाकरे यांना प्रत्येक तारखेला निलंगा न्यायालयात येणे शक्य नसल्याने हे प्रकरण वर्ग करण्याची विनंती केली होती. तसेच, त्यावेळेस त्यांना जामिनही दिला होता. पण, तारखेला हजर राहात नसल्यामुळे न्यायालयाने पुन्हा एकदा राज ठाकरे यांना अटक वॉरंट जारी केला आहे.
या प्रकरणातील तत्कालीन तालुका प्रमुख आणि इतर 3 जण शुक्रवारी न्यायालयात हजर राहिले होते. त्यांचे काढलेले वॉरंट विना तामील झाले होते. त्यामुळे न्यायालयाने चौघांचा जामीन रद्द केला होता. पुन्हा न्यायालयाने दंड लावला आणि नवीन जामीन देण्याचा आदेश चौघांना दिला होता. दरम्यान, राज ठाकरे यांच्यासोबतच मनसेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख अभय सोळूंके हजर राहत नसल्यामुळे त्यांनाविरोधातही पुन्हा अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे.