• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रोहात मटका जुगारासह अवैधधंदे खुलेआम सुरु; ना. तटकरेंनी लक्ष द्यावे, महिलावर्गाची मागणी

ByEditor

Jul 17, 2023

अमोल पेणकर
रोहे :
शहर व परिसरात मटका, तीनपत्ती जुगार, ऑनलाईन चक्री जुगार हे धंदे गेल्या वर्षभरापासुन खुलेआमपणे सुरु आहेत. यासोबतच गावठी दारू, गांजा व अन्य अमली पदार्थांची बिनदिक्कत विक्री नाक्यानाक्यावर होत आहे. यामध्ये पुरुष मंडळी विशेषतः युवा पिढी आहारी जात व्यसनाधीन होत आहे. कुटंबाचा आधार असणारा कर्ता पुरुष व घरातील तरुण मुले या जुगार, मटक्याच्या नादात आपली रोजची कमाई घालवून कर्जबाजारी होत आहेत. यासोबतच विनासायास मिळत असणारी गावठी दारू व नशेचे पदार्थ यामुळे व्यसनाधीन होत अनेकांनी आपल्या आयुष्याचे वाटोळे करत घरांवर वरवंटा फिरवून कुटुंब उध्वस्त होत आहेत. महिला वर्ग यामुळे पुर्णतः त्रस्त झाला असून कधी हे अवैध धंदे बंद होतात याकडे आशेने पहात आहेत. वर्षभरानंतर आ. आदिती तटकरे पुन्हा एकदा मंत्री पदावर विराजमान होत त्यांच्याकडे महिला व बालकल्याण खाते आले आहे. त्यामुळे वर्षभरात खुलेआम सुरु असलेले सर्व अवैध धंदे बंद करण्याकरिता त्यांनी जातीने लक्ष घालत ते तात्काळ बंद करावेत अशी मागणी रोह्यामधील महिला वर्गाकडून होत आहे. त्यांचे आदेश व नव्याने रोहे उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या सोनाली कदम याही महिला असल्यामुळे नक्कीच आता शहरातील सर्व अनधिकृत व अवैध धंदे बंद होतील असा विश्वास महिला वर्गातून व्यक्त होत आहे.

रोहे अष्टमी शहर हे स्वाध्याय प्रणेते प. पू. पांडुरंग शास्त्री आठवले, महाराष्ट्राचे कंठमणी म्हणून ओळखले जाणारे डॉ. चिंतामणराव देशमुख यांचा वारसा जपणारे गाव म्हणून देशभर ओळखले जाते. यासोबतच विद्यमान खा. सुनील तटकरे यांचे आजच्या राज्यातील राजकारणातील असलेल्या महत्वपूर्ण स्थानामुळे रोहे या नावास वेगळेच वलय प्राप्त झाले आहे. असे असताना हेच शहर आज मटका, जुगार याचे महत्वाचे केंद्र बनत सर्वच अवैध व अनधिकृत धंद्यांचे आगार दिवसेंदिवस होत आहे. हे शहरास नक्कीच भूषणावह नाही. आज शहरातील असा एक चौक व नाका नाही ज्या ठिकाणी मटका  खेळला जात नाही. पान टपरी व अवैध झोपड्या उभारून त्या ठिकाणी खुलेआम मटक्याचे आकडे स्विकारले जात आहेत. धाटाव औद्योगिक वसाहतीत रोजंदारीवर काम करणारे व शहरात मोलमजुरी करणारे आपल्या कष्टाची कमाई या ठिकाणी लावत कंगाल होत आहेत. यासोबतच आजच्या ऑनलाईन जमान्यात माहीर असलेली युवा पिढी चक्री जुगारच्या आहारी जात आहे. वर्दळीच्या व मोक्याच्या ठिकाणी असलेल्या गाळ्यांमध्ये दिवसभर शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांसह युवा पिढी ऑनलाईन जुगार खेळताना पहावयास मिळत आहे. यामुळे अनेकजण कर्जबाजारी होत काहींनी जीवनाचा शेवट केला आहे किंवा कर्जातुन बाहेर पडण्यासाठी चोरी व अन्य चुकीचे मार्ग अवलंबून आपले उज्वल भविष्य उध्वस्त केले आहे. यासोबतच आज शहरात गांजा, चरस व अन्य तत्सम नशेचे पदार्थ यांची विनासायास विक्री होत आहे. त्यामुळे नशेबाजांचे प्रमाण वाढत असून रात्रीच्या वेळी महिला वर्गाला घरा बाहेर पडणे धोकादायक बनले आहे.

गेल्या वर्षभरापासुन शहरातील हे सर्व अवैध व अनधिकृत धंदे यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडत कुटुंब उध्वस्त होत आहेत. आ. अदिती तटकरे या पुन्हा मंत्री होत आता त्यांचेकडे महिला व बालकल्याण विभागाचे कॅबिनेट मंत्रीपद आले आहे. याचा मनस्वी आनंद रोहेकरांना झाला असून  मिळालेल्या संधीचा उपयोग शहरातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी करतील असा विश्वास महिला वर्गातून व्यक्त होत आहे. मात्र याची सुरुवात त्यांनी सर्वप्रथम शहरातील सर्व अवैध व अनधिकृत धंदे बंद करत करावेत अशी अपेक्षा महिला वर्गाकडून आहे. आता विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. मागील वर्षी याच अधिवेशनात तत्कालीन विरोधीपक्ष नेते व विद्यमान उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी राज्यातील सर्वच ठिकाणच्या अवैध व अनधिकृत धंद्यांचा प्रश्न ऐरणीवर घेत त्यावर राज्य सरकारला कारवाई करण्यास भाग पाडले होते. त्याप्रमाणे आता सुरु असलेल्या अधिवेशनात ना. अदिती तटकरे यांनी रोह्यामधील सर्व अनधिकृत धंदे बंद करण्यासंबंधी कारवाईचे आदेश पोलिस प्रशासनास द्यावेत अशी मागणी महिला वर्गाकडून होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!