• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

लोकसभेत भाजपमुळे शिंदेंचे हे खासदार पडले; बच्चू कडू यांचा मोठा गौप्यस्फोट

ByEditor

Sep 16, 2024

मुंबई : लोकसभा निवडणुकीत महायुतीला चांगलाच झटका बसला होतो. त्यामुळे या झटक्यातून महायुतीचे नेते अजूनही सावरले नाही. या निवडणुकीचे कवित्व सुरु आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदाराने भाजपला सुनावले आहे.

भाजपकडून युती धर्माचे पालन झाले नाही. निर्णयात हस्तक्षेप झाला. भाजपने युती धर्म पाळला असता तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आणखी चार आमदार निवडून आले असते, असा दावा प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना भाजपवर जोरदार टीका केली.

भाजपकडून युती धर्माचे पालन नाही

लोकसभा निवडणुकीमध्ये अमरावतीचा सर्व्ह हा भाजप विरोधात होता. भाजपच्या अर्ध्या पदाधिकाऱ्यांची नवनीत राणा यांच्यावर नाराजी होती. त्यांची उमेदवारी का बदलली नाही? हा प्रश्न आहे. तसेच भाजपने शिवसेनेची नांदेड, यवतमाळची उमेदवारी बदलवली. या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये भाजपचा हस्तक्षेप झाला. त्याऐवजी भाजपने हे काम ज्याच्या घरचे आहे त्यालाच करू दिले पाहिजे होते. युतीचा धर्म जर भाजपने व्यवस्थित पाळला असता तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आणखी चार खासदार निवडून आले असते, असा दावा बच्चू कडू यांनी केला.

कुठलाही पक्ष निवडून येणाऱ्यालाच तिकीट देतो. निवडून येणारा माणूस गांजा विकणारा जरी असला तरी त्याला उमेदवारी दिली जाते. कारण निवडणुकीत जो जिता वही सिंकदर असतो. लाडकी बहीण योजनेवर महायुतीमध्ये श्रेयवाद आहे. ती स्पर्धा आहे. लाडकी बहीण योजना कोणी आणली? हे त्यांनाच माहीत, असा उपरोधिक टोला बच्चू कडू यांनी लगावला.

केंद्रात भाजप सरकारने ओबीसीला 10 टक्के आरक्षण वाढून द्यावे. म्हणजे मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देता येईल, अशी सूचना बच्चू कडू यांनी केली. अजित पवार यांच्यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, अजित पवार यांचे अर्ध्यापेक्षा अधिक आमदार शरद पवार यांच्या सोबत जातील. अजित पवार जात असतील तर त्यांना कोणी अडवले? असे बच्चू कडू यांनी म्हटले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!