नागरिकांसह प्रशासनाला सतर्कतेचा इशारा
किरण लाड
नागोठणे : भारतीय हवामान विभाग यांच्याकडील हवामान विषयक पूर्वसूचनांनूसार दि.17 ते 21 जुलैपर्यंत रायगड जिल्ह्यात काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून जिल्ह्याला ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
त्या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांना व प्रशासनाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांनी त्यांचेकडील शोध व बचाव साहित्य, मणुष्यबळ तत्पर ठेवावे. तसेच नियंत्रण कक्ष कार्यन्वित राहतील याची दक्षता घ्यावी. यावेळी समुद्र खवळलेल्या स्थितीत असल्याने मच्छीमारांनी खोल समुद्रामध्ये मासेमारीसाठी जावू नये. अतिवृष्टीमुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता, समुद्राला येणारी भरती, अतिवृष्टी, धरणांतून सोडण्यात येणारा विसर्ग, यामुळे पुरग्रस्तभागातील घरांमध्ये पाणी शिरुन पुरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. कमी वेळेत अतिवृष्टी होत असल्याने दरड कोसळण्याचा धोका असतो. त्यामुळे दरड व पूरग्रस्त भागातील नागरिकांनी अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेवून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे, तसेच जनावरांना देखील सुरक्षित ठिकाणी बांधावीत असे आवाहन व मार्गदर्शक सुचना रायगड जिल्हाधिकारी कार्यालय आपत्ती व्यवस्थापन विभाग यांनी दिल्या आहेत.