कल्याण : बदलापूर शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये अक्षय शिंदे एन्काउंटरमध्ये मारला गेला. त्यानंतर घडामोडींना वेग आला आणि मागील अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शाळेच्या संस्थापक आणि सचिवाला अटक करण्यात आली होती. पण दोनच दिवसांमध्ये दोघांनाही जामीन मिळाला आहे. तसंच मुख्याध्यापिकेलाही जामीन मंजूर झाला आहे.
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला. या प्रकरणातील आरोप अक्षय शिंदेचा सिनेमाला लाजवेल असा एन्काउंटर झाला. त्यानंतर आठवड्याभरानंतर शाळेचे संचालक तुषार आपटे आणि उदय कोतवाल या दोघांना कल्याण न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. दोन प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे. पहिल्या प्रकरणामध्ये गुरुवारीच जामीन देण्यात आला होता. त्यानंतर तुषार आपटे ,उदय कोतवाल यांना एसआयटी टीमने कल्याण न्यायालयात हजर केलं होतं. कोर्टाने दोघांनाही जामीन मंजूर केला.
दरम्यान, याच प्रकरणात शाळेतील मुख्याध्यापिका यांना दुसऱ्या गुन्ह्यात ही जामीन मंजूर झाला आहे. दोन्ही मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात अटक करण्यात आली होती. शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना आठवले स्वत:हून न्यायालयात हजर झाल्या होत्या. अर्चना आठवलेला प्रकरणाची माहिती असून सुद्धा माहिती लपवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यावर जी कलमं लावण्यात आली होती. ती जामीन मिळणारी असल्याने 25 हजारांच्या जातंमुचलक्यावर न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केलेला आहे.