• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माणगाव : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ कार्यक्रमासाठी आलेल्या महिलांची रखडपट्टी

ByEditor

Oct 9, 2024

कार्यक्रमाचे स्थानिक पत्रकार, बहुतांशी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांना निमंत्रणच नाही; मुंबईतील पत्रकारांना प्राधान्य

सलीम शेख
माणगाव :
माणगावमधील मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण योजना’ कार्यक्रमाचे स्थानिक पत्रकारांना तसेच बहुतांशी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना निमंत्रणच न दिल्याने या कार्यक्रमाबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी माणगाव तालुक्यातील तसेच रायगड जिल्ह्यातील स्थानिक पत्रकारांना साधे निमंत्रण या कार्यक्रमाच्या आयोजकांकडून देण्यात आले नाही. मात्र, मुंबईतील वाहिन्यांचे प्रतिनिधी व वृत्तपत्रांचे पत्रकार यांना प्राधान्य देण्यात आले. या कार्यक्रमास सकाळी ९:३० वाजल्यापासून लाडक्या बहिणींना बोलावून त्यांना सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत थांबवल्याने त्यांची रखडपट्टी झाली.

माणगावमधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळ्याचा हा कार्यक्रम प्रसिद्ध केलेल्या कार्यक्रमपत्रिकेनुसार सकाळी ११:३० वाजता होणार होता. त्यासाठी सकाळी ९:३० वाजल्यापासूनच एसटी बसेसमधून रायगड जिल्ह्यातील विविध गावांतील महिलांना कार्यक्रम ठिकाणी आणण्यात आले. हा कार्यक्रम माणगावपासून मोर्बा रोड मार्गावर जवळपास दिड किलोमीटर अंतरावर असणाऱ्या दिघी-पुणे राज्य मार्गावरील मोर्बा गावाजवळील निळगूण फाटा येथील अल्ताफदादा धनसे यांच्या भव्य मैदानावर होता. पार्किंगची व्यवस्था ज्या-ज्या ठिकाणी करण्यात आली होती, ती ठिकाणे वाहनांनी फुल्ल झाल्यावर अन्य वाहने जागा मिळेल त्या ठिकाणी उभी करण्यात आली. त्यामुळे अनेक महिलांना एक किलोमीटरचे अंतर पायपीट करून कार्यक्रम ठिकाणी यावे लागले. या महिलांना कार्यक्रम ठिकाणी धापा टाकत यावे लागले. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात या कार्यक्रमाची वेळ ३ ची होती. २:४० वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यक्रम ठिकाणी आगमन होऊन २:४५ वाजता कार्यक्रमाला सुरवात झाली. त्यानंतर पुढे ४ वाजता हा कार्यक्रम संपला. कार्यक्रम संपल्यावर पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना आपण कोणत्या बसमधून आलो होतो याची वाट बघत ताटकळत उभे राहावे लागले. त्यातच कार्यक्रम सुरु असताना पावसाचे आगमन झाले. कार्यक्रम संपल्यावर पाऊस पडत असल्याने महिलांची घरी जाण्यासाठी धावाधाव झाली. अलीशान हेलिकॉप्टर व वाहनांमधून आलेले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह सारे मंत्री, नेते मंडळी हे मात्र मोठ्या ऐशोआरामात आपल्या पुढील प्रवासाला निघाले.

माणगावमधील या मोठ्या कार्यक्रमाचे स्थानिक पत्रकारांना साधे निमंत्रणही दिले गेले नाही. इतर छोट्या कार्यक्रमांना दहा-दहा वेळा फोन करून हेच प्रशासनवाले व लोकप्रतिनिधी स्थानिक पत्रकारांना आपल्या कार्यक्रमाचा गवगवा करण्यासाठी बोलावत असतात. अशा वेळी त्यांनी मुंबईच्याच पत्रकारांना बोलवावे अशी नाराजी स्थानिक पत्रकारांकडून या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात आली. स्थानिक पत्रकारांसाठी कोणतेही नियोजन या कार्यक्रमात नव्हते. प्रशासनाने साधे ओळखपत्र, पास पत्रकारांनी कार्यक्रमाच्या चार दिवस अगोदर मागितल्यानंतरही त्यांना देण्यात आली नाही. त्यामुळे अनेक पत्रकारांची बाहेरून पोलीस बंदोबस्त मागविलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्याशी बाचाबाची झाली. मुंबईतील पत्रकारांची मात्र स्टेजच्या जवळपर्यंत व्यवस्था करण्यात आली होती. या मुंबईच्या पत्रकारांमुळे रायगड जिल्ह्यातील स्थानिक पत्रकारांना साधे फोटोही घेता आले नाहीत.

या कार्यक्रमाच्या प्रचारासाठी माणगाव बाजारपेठेत व मोर्बा रोड मार्गावर ठिकठिकाणी उभारण्यात आलेले कमानी, लावलेले बॅनर्स, होर्डिंग्स यावर राज्यसभेचे खा. धैर्यशील पाटील यांचा फोटो नसल्याने रायगड जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांनी चक्क नाराजी दर्शवली. या कार्यक्रमास उपस्थित असलेले भाजप युवा मोर्चाचे रायगड जिल्हाध्यक्ष निलेश थोरे यांनी पत्रकारांसमक्ष नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, आम्हाला वाटले आमचे लोक येतील परंतु ते आले नाहीत. आम्हाला या कार्यक्रमांतून आयोजकांनी पूर्णपणे डावलले. तसेच माणगाव शहरात सकाळपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी आम्हाला या कार्यक्रमाची साधी माहिती कोणी दिली नाही व निमंत्रणही दिले नसल्याने नाराजी व्यक्त केली. एकंदरीत या कार्यक्रमाचे नियोजन शून्य होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!