घनःश्याम कडू
उरण : राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल येत्या काही दिवसात वाजणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी, महायुती अशी लढत होणार असली तरी तिसरी आघाडी उदयास येत आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत उभे राहण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी सुरू झाली आहे. रायगड जिल्ह्यातही इच्छुकांनी उमेदवारी मिळविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली असल्याने अनेक नवे चेहरे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात दिसण्याची शक्यता दिसू लागली आहे. त्यामुळे ऐनवेळी उमेदवारी न मिळाल्याने महाविकास आघाडी व महायुतीत बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रायगड जिल्ह्यातील अनेक इच्छुकांनी महाविकास आघाडी व महायुतीतील घटक पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे जरी एखाद्या पक्षाचा मतदार संघ असला तरी काही जागांसाठी तडजोड होऊन अदलाबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रायगड जिल्ह्यातही अनेक इच्छुकांनी उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामध्ये काही नवोदित चेहरे तसेच काही जागांवर जुन्या उमेदवारांना आराम देऊन इतरांना संधी देण्याची मागणी पक्षाबरोबर पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून होऊ लागली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी व महायुतीच्या नेत्यांचा उमेदवारी देताना कस लागणार आहे.
रायगड जिल्ह्यातील इच्छुक आपल्या पक्षाच्या वरिष्ठांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. तर काही ठिकाणी जातीभेदाचे राजकारण व वरिष्ठांना आराम देऊन नवीन स्थानिक चेहर्यांना संधी देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर होत नाही तोपर्यंत महाविकास आघाडी व महायुतीकडून अधिकृत उमेदवार जाहीर होणार नाही. यामुळे इच्छुकांनी आपली ताकद दाखविण्यासाठी मेळावे अथवा शक्तिप्रदर्शन दाखविण्यास सुरुवात केली आहे. अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर इच्छुकांची मनधरणी करण्यात नेतेमंडळी यशस्वी होतात की इच्छुक बंडखोरी करतात हे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरच चित्र स्पष्ट होईल तोपर्यंत वाट पहावी लागणार आहे.