मुख्यालय सोडून वास्तव्य करणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी
घन:श्याम कडू
उरण : दोन तीन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाचा तडाखा उरणकरांना बसला आहे. तालुक्यातील अनेक गावांत पाणी घुसून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. जीवितहानी झाली नसली तरी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

उरणमध्ये पावसाने थैमान घातले आहे.कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील व शहरातील अनेक भागातील रस्ते जलमय झाल्याचे दिसत आहे. यामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. तसेच चिरनेर, भेंडखळ, नवघर, मोठी जुई, जसखार, कंठवली, विंधणे, रांजणपाडा (जासई) आदी गावात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. मुसळधार पावसामुळे मात्र उरण मधील नागरिकांचे जनजीवन पार विस्कळीत झाले आहे. शाळांना सुट्टी देण्यात आली होती तरी काही ठिकाणच्या शाळा सुरू असल्याचे समजते. उरणमधील आपत्कालीन व्यवस्था जागृत असल्याचे दिसत नव्हते. यापूर्वी ही आपत्कालीन व्यवस्थेचे गाऱ्हाणे मांडले होते. परंतु प्रशासनाने त्याची हवी तशी दखल घेतली नाही. यापुढे तरी शासकीय यंत्रणेची माहिती जनतेला द्यावी जेणेकरून वेळेत मदत मिळेल.

आज सकाळ पासून जागृत पत्रकारांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर उरणमधील शासकीय यंत्रणा कार्यरत होऊन परिस्थितीची पहाणी करण्यासाठी मंडळ अधिकारी,तलाठी, कोतवाल , ग्रामसेवक तैनात करण्यात आले आहेत. तालुक्यात जीवितहानी झाली नसली तरी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्याच्या परिस्थितीवर प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून असल्याची माहिती उरण तहसीलदार उध्दव कदम यांनी दिली. आज उरणमधील आपत्कालीन मदतीसाठीचा असलेल्या ग्रुपचे अनेक सदस्य तालुक्यातील अनेक भागात आपापल्या परीने मदत करीत होते.
शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालय ठिकाणी वास्तव्य करणे बंधनकारक असतानाही या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होऊन मुख्यालय सोडून बहुतांश अधिकारी व कर्मचारी वास्तव्य करून असल्याचे चित्र पहावयास मिळते. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन मुख्यालय सोडून वास्तव्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी वर्गावर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.