किरण लाड
नागोठणे : पावसाळा सुरु झाला कि, नदी, नाले, ओढे, तलाव पाण्याने तुडुंब भरतात. अशातच फेसाळ, सफेद पाण्याचे धबधबे पर्यटकांना साद घालतात. या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक तसेच पर्यटक धबधब्यावर मौजमजा करण्यासाठी येत असतात. अशावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न तसेच जीवितहानी देखील घडत असते. अशा घटना टाळण्यासाठी शासनाला यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या लागतात.
रोहा तालुक्यातील मौजे ऐनवहाळ, सुकेळी (मांडवशेत), तळाघर तसेच मौजे वावे-पोटगे येथील धबधब्यावर मौजमजा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक पावसाळ्यात येत असतात. अशावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण निर्माण होऊ नये यासाठी रोहा उपविभागीय दंडाधिकारी यांच्यावतीने धबधबे परिसरात मौजमजा करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना व पर्यटकांना या वर्षात एक महिन्यासाठी आजपासुन मनाई आदेश लागु करण्यात आला आहे. आदेश मोडल्यास पर्यटकांवर कारवाई करण्याचे निर्देश रोहा उपविभागीय दंडाधिकारी यांनी दिले आहेत.