नवी दिल्ली : बहुप्रतीक्षित महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगूल आज वाजणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आज दुपारी ३.३० वाजता पत्रकार परिषद घेऊन राज्यातील आणि झारखंड येथील विधानसभा निवडणुकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहे. या बाबत निवडणूक आयोगाने पत्रक काढले आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आता पुन्हा रंगणार आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी पक्षाच्या सभा, लोकार्पण सोहळे आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचा सपाटा लावला आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी राज्यभर दौरे आणि विविध निर्णयांचा धडाका लावला आहे. त्यात आज ७ आमदारांचा शपथविधी दुपारी १२ वाजता होणार आहे. त्यानंतर दुपारी ३.३० वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे.