• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कोळी बांधवांना सुगीचे दिवस! करंजा बंदरात मच्छिची आवक वाढली

ByEditor

Oct 19, 2024

अनंत नारंगीकर
उरण :
ऑक्टोबर महिन्यात करंजा मच्छीमार बंदरात मोठ्या प्रमाणात खोल समुद्रातील मासळीची आवक वाढली आहे. आवकेच्या तुलनेत मागणी चांगली असल्याने व घाऊक बाजारात माशांना भाव चांगला मिळत असल्याने मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांना सुगीचे दिवस आले आहेत. त्यामुळे कोळी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असल्याचे दिसून येत आहे.

मुंबई येथील वाहतूक कोंडी व इतर समस्या यामुळे भाऊचा धक्का येथील ससुन डॉक येथील मच्छीमार बंदरावरील भार कमी करण्यासाठी राज्य सरकारने रायगड जिल्ह्यातील करंजा येथील मच्छीमार बंदर उभारणीच्या कामाला सुरुवात केली. या बंदराच्या विकासासाठी सुमारे १५३ कोटींच्या वर निधी मंजूर करून खर्च करण्यात आला असून, हे बंदर देशातील मत्स्य व्यवसायासाठी सर्वात मोठे फिशिंग हब म्हणून विकसित करण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उरण येथील विविध विकासकामांच्या उद्घाटन व भूमिपूजन प्रसंगी केले होते.

सध्या करंजा मच्छीमार बंदराचे काम काही अंशी अपुर्ण अवस्थेत आहे. मात्र कोळी बांधवांच्या आग्रहाखातर करंजा मच्छीमार बंदरातून खोल समुद्रातील मासे विक्री केली जात असून मोठ्या प्रमाणात या बंदरातील विविध जातींचे १५० टनांपर्यंत मासे हे मुंबई, ठाण्यासह गुजरात, गोवा, आंध्र प्रदेश व दक्षिण भारतात जात आहेत. एकंदरी करंजा मच्छीमार बंदरातून मोठ्या प्रमाणात खोल समुद्रातील माशांची देवाण घेवाण ही मत्स्य व्यवसायाच्या माध्यमातून विविध राज्यांतील भागात होत असल्याने कोळी बांधवांना सुगीचे दिवस आले असून माशांच्या विक्रीतून चांगला भाव मिळत असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असल्याचे दिसून येत आहे.

उरण, अलिबाग, रेवदंडा या ठिकाणावरील कोळी बांधव मोठ्या प्रमाणात खोल समुद्रातील मासेमारीचा व्यवसाय करत आहेत. भाऊचा धक्का येथील बंदरातून मत्स्यव्यवसाय करताना येथील कोळी बांधवांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. मात्र राज्य सरकारने उभारलेले करंजा मच्छीमार बंदर हे खुप फायद्याचे ठरणार आहे. सध्या या बंदरातून १५० ते २०० टन खोल समुद्रातील मासे हे मुंबई बरोबर गुजरात गोवा आणि दक्षिण भारतात विक्रीसाठी जात असून त्या मत्स्यव्यवसायातून चांगला भाव मिळत आहे. मात्र बंदराला जोडणाऱ्या रस्त्याचे काम हे अपुर्ण अवस्थेत तसेच सुविधा उपलब्ध नसल्याने त्याचा त्रास थोडासा आम्हा कोळी बांधवांना सहन करावा लागत आहे
नारायण कोळी
माजी चेअरमन, करंजा मच्छीमार सहकारी संस्था

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!