किरण लाड
नागोठणे : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पुर्वसुचनेनुसार रायगड जिल्ह्यात गेली दोन दिवस पावसाने थैमान घातले होते. जिल्हयातील अनेक नद्यांना पूर येऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. नागोठण्यातील अंबा नदीला पुर येऊन शहरातील काही भागात पूराचे पाणी शिरुन जनजीवन विस्कळीत झाले होते. परंतु आज पावसाने थोडी विश्रांती घेतल्यावर जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे.

गेली दोन दिवस मुसळदार पावसामुळे नागोठण्यातील अंबा नदीला पूर आला होता. पूराचे पाणी बसस्थानक परिसर, बाजारपेठ, कोळीवाडा, हॅाटेल लेक व्हयू परिसर, मोहल्ला या भागात घुसले होते. बाजारपेठेतील दुकानदारांच्या दुकानात, लोकांच्या घरात पाणी घुसले. धो-धो कोसळणारा पाऊस, पूराचे पाणी, लाईट गेलेली यामुळे नागोठणेकरांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. बस, शाळा, वहातुक, बाजारपेठ, वीज इत्यादी सेवा बंद होत्या. यावेळी लोकांना १९८६ तसेच २००५च्या महापुराची आठवण झाली. परंतु आज पावसाने थोडी विश्रांती घेतली असल्याने दुकानदरांनी आपल्या दुकानात शिरलेले पाणी, चिखल साफ करण्यास सुरुवात केली आहे. ज्या लोकांच्या घरात पूराचे पाणी शिरले होते त्यांनी आपल्या घराची साफसफाई केली आहे. बसस्थानकातील पूराचे पाणी ओसरले असून शहरातील वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. शाळा, कॉलेजला जरी सुट्टी असली तरी एकंदरित नागोठण्यातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे.