• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

श्रीवर्धनमधील अतिवृष्टीचा धोका टळला!

ByEditor

Jul 20, 2023

• खूजारे येथील कार्ले नदीकिनारी दिघी सागरी पोलिसांचा चोख बंदोबस्त
• पाणी ओसरल्याने वाहतूक सुरळीत सुरू

गणेश प्रभाळे
दिघी :
मोसमी पावसाचे पुनरागमन झाले आणि राज्यात चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविली. अशातच बुधवारी रायगडला अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला. मात्र, श्रीवर्धन तालुक्यातील पावसाचे पर्जन्यमान कमी प्रमाणात झाल्याने अतिवृष्टीचा धोका टळला असून येथील जनजीवन सुरळीत सुरू आहे.

सोमवारपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपले. यामुळे तिसऱ्या दिवशी रायगड जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. यामध्ये महाड, रसायनी, आपटा, नागोठणे, रोहा, चिरनेर परिसरातील नद्यांनी गावांना पूराचा वेढा दिला. याच दरम्यान जिल्ह्यातील १६ तालुक्यांच्या तुलनेत श्रीवर्धन तालुक्यात आज दिनांक २० रोजी पर्यंत ५५ मिलिमीटर सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे तुरळक पावसामुळे यावेळी दिघी ते आगरदांडा ही प्रवासी जलवाहतूक सुरुच असल्याची माहिती देण्यात आली.

श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन-श्रीवर्धन मार्गावर बुधवारी रात्री साडे दहाच्या सुमारास खूजारे हद्दीत कार्ले नदीने पाण्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे रात्रीच्या वेळी रस्त्यावर पाणी आल्याने पूरसदृश्य बनली होती. तात्काळ दिघी सागरी पोलिस ठाण्याचे सहा पोलिस निरीक्षक डॉ. प्रसाद ढेबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचाऱ्यांनी कोणताही अनुचित घटना घडू नये म्हणून रस्ता बंद करून चोख बंदोबस्त ठेवला होता. काही तासातच पाणी ओसरले व मार्ग सुरू करण्यात आला. सर्व ठिकाणची वाहतूक व्यवस्था सद्यस्थितीत सुरळीत असून जनजीवन देखील सुरळीत सुरू आहे. तूर्तास तालुक्याचा अतिवृष्टीचा धोका टळला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!