निजामपूर भागातील नागरिक हैराण, ऐन पावसाळ्यात वीज पुरवठा खंडीत
सलीम शेख
माणगाव : ऐन पावसाळ्यात निजामपूर विभागात वीज पुरवठा सतत खंडीत होत असल्याने नागरिक कमालीचे संतप्त झाले आहेत. या भागातील अनेक वीज तारेवर झाडे, झुडपे, वेली वाढल्यामुळे वीजेच्या वायर तुटण्याचे प्रकार घडत आहेत. तर अनेक वेळा जनित्र बिघाड, विजेचे खांब कोसळणे यासारखे प्रकार घडत आहेत. त्यामुळे नागरिकांना वीज खंडीतचा शॉक बसत आहे. ऐन पावसाळ्यात वीज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिकांना विविध समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
पावसाळा सुरु होण्यापूर्वी वीज मंडळ कर्मचाऱ्यांनी धोकादायक कुजलेले खांब बदलून नव्याने खांब बसवण्याची गरज असते. तसेच ज्या वाहिनीवर बांबूची झाडे रायवळी झाडे – झुडपे वाढतात, ती तोडून पावसाळ्यापूर्वीच काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र निजामपूर भागातील वीज कर्मचारी याकडे दुर्लक्ष करतात. पावसाळ्यात विशेषतः वीज वायर तुटल्यानंतर हे जागे होतात. त्यामुळे नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. निजामपूर भागात वीजेचा सतत तांत्रिक बिघाड होत असतो. या विभागातील निजामपूर हि मोठी बाजारपेठ आहे. या बाजारपेठेवर अनेक लहान मोठे व्यवसाय चालतात. त्याचबरोबर ग्रामीण भागातून आलेला नागरिकाला हि या वीज खंडीतचा त्रास सहन करावा लागतो. पाणीपुरवठा, पिठाच्या चक्की, झेरॉक्स सेंटर, फोटोग्राफी, दुध डेरी त्याचबरोबर विजेवर चालणारी विविध उपकरणे बंद पडतात. त्यामुळे आर्थिक नुकसानी बरोबरच वेळ व पैसा वाया जातो. निजामपूर भागात गेली २० दिवसापासून एकही दिवस वीज खंडीत झाली नाही असा एकही दिवस गेला नाही. त्यामुळे नागरिक कमालीचे हैराण झाले असून आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
निजामपूर ग्रामसचिवालय येथे कनिष्ठ अभियंता कार्यालय असून एक कनिष्ठ अभियंता व कर्मचारी वर्ग आहे. मात्र पावसाळ्याचे दिवस असताना या ठिकाणी रात्री अपरात्री लाईट गेल्यास किंवा एखादी दुर्घटना घडल्यास किमान दोन कर्मचारी रात्रीचे वेळी कार्यालयात असणे गरजेचे आहे. मात्र एकही कर्मचारी इथे राहत नाही. यासाठी आपण माणगाव सहाय्यक अभियंता यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
-राजाभाऊ रणपिसे,
सरपंच, ग्रामपंचायत निजामपूर