• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

‘मशि‍दीवरील भोंगे उतरणार नाहीत आणि राज ठाकरेंची सत्ताही कधी येणार नाही’, रामदास आठवलेंची खोचक टीका

ByEditor

Nov 7, 2024

वृत्तसंस्था
मुंबई :
महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेच्‍या हाती सत्‍ता दिली तर एकाही मशिदीवर भोंगा दिसणार नाही, असे वक्‍तव्‍य राज ठाकरे यांनी अमरावती येथे एका जाहीरसभेदरम्यान केले होते. या वक्तव्यावर आता राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) प्रमुख रामदास आठवले यांनी एएनआय वृत्तवाहिनीशी बोलताना राज ठाकरेंच्या विधानावर टीका केली. मशि‍दीवरील भोंगे कधीही हटणार नाहीत, अशी भूमिका मांडत असताना रामदास आठवले यांनी मनसेची सत्ता कधीही येणार नाही, असे सांगितले. मनसेचा एकच आमदार निवडून येतो, तोही स्वतःच्या जीवावर निवडून येतो, असेही आठवले म्हणाले.

रामदास आठवले एएनआयशी बोलताना म्हणाले की, राज ठाकरे वारंवार अशाप्रकारचे विधान करत असतात. आमचे सरकार आले तर मशि‍दीवरील भोंगे हटविणार असे ते म्हणतात. पण मशि‍दीवरील भोंगे हटणार नाहीत आणि राज ठाकरेंची सत्ताही कधी येऊ शकत नाही. कितीही वर्ष गेले तरी राज ठाकरेंची सत्ता येऊ शकत नाही. त्यांचा एकच आमदार निवडून येतो, तोही स्वतःच्या जीवावर. मग त्यांचे सरकार कसे येणार? आणि ते कसे भोंगे हटवू शकणार?

“मी दहशतवादी असलेल्या मुसलमानांचा नेहमीच विरोध केला आहे. पण देशावर, भारताच्या संविधानांवर प्रेम करणारे आणि हिंदूंशी बंधुभाव राखून राहणाऱ्या मुसलमानांचा विरोध करणे ठीक नाही. मशिदीत एक-दोन मिनिटांची अजान होत असते, त्यासाठी भोंगे हटविण्याची काय गरज आहे. भोंगे हटविण्यापेक्षा गरीबी हटवा, भ्रष्टाचार हटवा, भोंगे हटविण्यापेक्षा विषमता, जातीयता हटविली पाहीजे. केवळ १४० – १४५ उमेदवार उभे करून आमदार निवडून येत नसतात. मनसेचे दोनही आमदार निवडून येणार नाहीत. पण राज ठाकरे असे विधान वारंवार करत राहिले, तर माझा पक्ष भोंगे हटविणाऱ्यांना धडा शिकवल्या राहणार नाही”, असेही रामदास आठवले म्हणाले.

अमरावतीचे मनसेचे उमेदवार पप्‍पू उर्फ मंगेश पाटील यांच्‍या प्रचारार्थ बुधवारी रात्री सायन्‍सकोर मैदानावर आयोजित प्रचार सभेत बोलत असताना राज ठाकरे यांनी भोंग्याबाबत विधान केले. मशिदींवरचे भोंगे बंद झाले नाही, तर मशिदीसमोर हनुमान चालिसा पठण करण्‍याचा इशारा मनसेने दिला होता. त्‍यावेळी उद्धव ठाकरे हे मुख्‍यमंत्री होते. आम्‍ही आंदोलन केल्‍यानंतर भोंगे बंद झाले होते. पण, त्‍यावेळी मनसेच्‍या १७ हजार कार्यकर्त्‍यांच्‍या विरोधात गुन्‍हे दाखल करण्‍यात आले होते, ही आठवण राज ठाकरेंनी करून दिली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!