• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुसळधार पावससामुळे खांब धामसई परिसरातील शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली!

ByEditor

Jul 21, 2023

पाठबंधारे विभागाच्या आडमुठेपणाच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

विश्वास निकम
गोवे-कोलाड :
मुसळधार पावसाने रायगडकरांना झोडपले असून जिल्ह्यात गेली चार दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने नद्या, नाले, धरणे तुडुंब भरून वाहू लागल्याने तसेच अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने खांब धामणसई परिसरातील शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेल्याने येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

कोलाड पाठबंधरेच्या आडमुठेपणाच्या धोरणांमुळे व त्यांच्या गलथान कारभारामुळे खांब धामणसई परिसरातील खरीपातील भात लावणी केलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याचे शेतकरी बोलत आहेत. गेली बारा-तेरा वर्ष कुंडलिकेचा उजवातीर तसेच डावातीर कालव्याची दुरुस्ती हा संशोधनाचा विषय बनला आहे. यावर जलसंपदा खात्याने करोडो रूपये खर्च केले. उन्हाळी पाणीच नाही तर केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पावसाळी पिकांच्या होत असलेल्या हानीला हे पाठबंधारे खातेच जबाबदार असल्याचे दिसत आहे.

रोहा तालुक्यातील कुंडलिका सिंचनातून निघालेला उजवातीर कालवा खांब, चिल्हे, देवकान्हे, धामणसई या परिसरातून गेला असून गेली चार पाच दिवस होत असलेलया मुसळधार पावसामुळे व अतिवृष्टीमुळे या कालव्याचे पाणी पलटी होऊन रस्त्यावरून शेतीत गेल्याने बळीराजाने खरीप हंगामाचे पेरणी केलेले धान लागवडीस तयार आहे तर काहींनी भात लावणी देखील केली असल्याने पूर्णतः वाहून गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

काही महिन्यांपूर्वी या कालव्यावर उडदवणे येथे कालव्याच्या दुतर्फा संरक्षण भिंतीचे बांधकाम केले गेले त्यामुळे अधिक मोठा धोका देवकान्हे पालदाड मार्गावर झाला असून रस्ता देखील वाहून गेला आहे. तर वाहून गेलेला रस्ता सदरील शेतकरी यांच्या शेतात गेल्याने खूप प्रमाणावर त्यांचे नुकसान झाले आहे. तसेच दोन विद्युत खांबाना देखील धोका निर्माण झाला आहे. ते केव्हाही कोसळू शकतात अशी स्थिती या पुराच्या पाण्याने केली आहे.

खांब धामणसई परिसरातील नडवली, तळवली, उडदवणे, मुठवली खुर्द, मालसई येथे कालव्याचे पाणी पलटी मारून रस्त्यावर आल्याने पाण्यातून ये-जा करणाऱ्या नागरिकांना तारेवरची कसरत करत दिवसभर मार्गक्रमण करावे लागत आहे तर हे सारे पाणी भातशेतीत घुसल्याने काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेताला खांडी जाऊन अनेक शेतकऱ्यांचे लावणीसाठी खणून ठेवलेले रोपे वाहून गेले तर काही जमीन पाण्याखाली गेल्याने पूर्णतः लागवड केलेली भातशेती वाया गेली आहे.

गेली बारा तेरा वर्ष खांब चिल्हे ते धामणसई विभागातील कालव्याला पाणी नसल्याने येथील बळीराजा उन्हाळी पीक घेत नसल्याने उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान तर पावसाळ्यात खरीप हंगामात पीक घेत असताना कोलाड पाठबंधारे खात्याच्या आडमुठेपणाच्या धोरणांमुळे कालव्याचे पाणी पलटी होऊन थेट शेतकऱ्यांच्या शेतात जात आहे. यावर खाते कोणतीच उपाययोजना करत नाही. त्या उलट बळीराजाला अधिक अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. डोंगराळ भागातील पावसाचे पाणी हे नाल्यात न जाता काही ठिकाणी ते थेट कालव्यात जात असल्याने कालव्यात पाण्याचा साठा अधिक होत असल्याने पलटी होत असून सदरील आजच्या घडीला शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीला हे पाठबांधरे खाते जबाबदार असेल त्यामुळे झालेले नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ शेतकऱ्यांना भरपाई द्यावी.

-अनिल महाडिक
सामाजिक कार्यकर्ते

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!