• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

सर्वहारा जन आंदोलन व भारत जोडो अभियान यांचा प्रसाद भोईर यांना पाठींबा

ByEditor

Nov 17, 2024

५० वर्षे दोनच घराण्यांनी मतदार संघांचे नेतृत्व केले मात्र विकास होऊ शकला नाही -प्रसाद भोईर

विश्वास निकम
कोलाड :
१९१ पेण मतदार संघातील मुख्य प्रश्न आहे रोजगार. आपल्या मतदार संघात रोजगार विषयी तरुणांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे. मुंबई जवळ असल्यामुळे येथील तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. यासाठी येथील आमदारांनी मोठं मोठे प्रकल्प आणायला पाहिजे होते. येथील आमदारांनी स्वतःच्या व मुलांच्या भविष्या व्यतिरिक्त कोणतेही काम केले नाही. आपल्या कोकणात धो धो पाऊस पडतो परंतु तरीही आपल्या मतदार संघात तसेच खाडेपट्टयात पाच महिने तीव्र पाणी टंचाई असते. धो धो पडणारे पाणी हे समुद्राला जाते परंतु तीन तीन धरणे उशाशी असुनही पाणी मिळत नाही गेली. ५० वर्षे दोनच घराण्यांनी या मतदार संघाचे नेतृत्व केले तरी या मतदार संघाचा विकास होऊ शकला नाही ही खेदाची गोष्ट आहे असे मत आंबेवाडी येथील प्रचार सभेत प्रसाद भोईर यांनी व्यक्त केले. तसेच मुंबई-गोवा महामार्गाचे काम हे गेली चौदा ते पंधरा वर्षांपासून सुरु असून दरवर्षी डेडलाईन दिली जाते. परंतु महामार्गाचे काम पूर्ण होत नाही. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. कोणाचा नाहक बळी जातो ही लोकप्रतिनिधीची जबाबदारी असते, परंतु या महामार्गाचे काम पूर्ण होऊ शकले नसल्याचे प्रसाद भोईर यांनी सांगितले.

आंबेवाडी बाजारपेठेत महाविकास आघाडीचे उमेदवार प्रसाद भोईर यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, विधानसभा उमेदवार प्रसाद भोईर, जिल्हा सह संपर्कप्रमुख किशोर जैन, जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, सुधीर ढाणे, काँग्रेस नेत्या नंदा म्हात्रे, जनहाराच्या उल्काताई महाजन, चेतना लोखंडे, चंद्रकांत लोखंडे, सुनिल महाडिक, कुलदीप सुतार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व कार्यकर्ते, असंख्य आदिवासी बांधव, महिला वर्ग उपस्थित होते.

माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आपल्या रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव कुलाबा होते, हे आताच्या पिढीला माहिती नसेल परंतु बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी ते बदलून रायगड जिल्हा ठेवले. कारण आपल्या एकमेव महाराष्ट्र राज्याला इतिहास आहे, बाकी राज्य भूगोल आहेत. यामुळे आपल्याला इतिहास घडवून प्रसाद भोईर यांना विजयी करून विधानसभेवर पाठवायचे आहे. कारण प्रसाद दादा भोईर हे उच्च शिक्षित असुन त्यांना प्रशासनाचे चांगले ज्ञान आहे.

यावेळी विधानसभा उमेदवार प्रसाद भोईर यांना सर्वहारा जन आंदोलन व भारत जोडो अभियान यांनी पाठींबा दिल्याचे पत्र देण्यात आले. यावेळी सर्वहरा जन आंदोलनच्या नेत्या उल्का महाजन यांनी सांगितले की, कोरोना काळात रांगेत उभे राहुन नोटा बदलाव्या लागल्या, मजुरांची वाताहत झाली. बदलापूरमध्ये साडे तीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाले. याचे उत्तर द्या. जीएसटीमधून पैसे उकळले व त्यातला एक तुकडा फक्त लाडक्या बहिणींना फेकला अशी जोरदार टीका त्यांनी यावेळी केली.

काँग्रेसच्या नेत्या नंदा म्हात्रे यांनी आपले मत व्यक्त करतांना सांगितले की, ज्यांना पक्षाने भरपूर काय दिले परंतु पक्षाला उतरती कळा लागल्यानंतर ते भाजपमध्ये गेले. परंतु त्यांना खारेपाट विभागातील ४५ गावाचा पाण्याचा प्रश्न सोडविता आला नाही. पेणचा सरकारी दवाखानाही आजारी आहे. आपण आमदार कशासाठी निवडतो, आपले प्रश्न मांडण्यासाठी की नाही? जिल्हा परिषदेच्या १२१ शाळा बंद पडल्या त्याच्यावर कोण बोलत नाही, हे सगळे आपले मुद्दे आहेत आरोग्य असेल, पाणी असेल, शिक्षण असेल, रोजगार हे आपले मुद्दे आमदारांनी सोडविले नसल्याचे त्यांनी सांगितले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!