शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते बाबूशेठ खानविलकरांचा इशारा
सलीम शेख
माणगाव : निजामपूर विभागातून विरोधकांनी मताधिक्य घेऊन दाखवावे राजकारण सोडून देईन असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते बाबूशेठ खानविलकर यांनी विरोधकांना दिला आहे. या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ नेते अनिल मोरे, प्रसाद गुरव यांच्यासह मधुकर सुर्वे, चंद्रकांत नलावडे, बाळ इंगावले, संजय बगडे, प्रकाश पाखड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
१९४ महाड विधानसभा मतदार संघाची निवडणूक २० नोव्हेंबर रोजी होत असून या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीचे शिंदे गटाचे उमेदवार आ. भरत गोगावले यांच्या प्रचारार्थ निजामपूर येथे शुक्रवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी खा. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत उमेदवार भरत गोगावले व त्यांचे पुत्र विकास गोगावले यांनी बाबूशेठ खानविलकर यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. या टीकेचा खरपूस समाचार घेण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते बाबूशेठ खानविलकर यांनी शनिवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी माणगाव तालुक्यातील निजामपूर विभागातील भाले गावातील आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांना ठणकावून सांगितले. यावेळी बोलताना बाबूशेठ खानविलकर म्हणाले कि, निजामपूरात काल शुक्रवारी शिंदे गटाची सभा झाली. या सभेला बाहेरून जास्त जनता आली होती. अनेक लोकांना १५० रुपये देऊन बोलावण्यात आले होते. या निजामपूर विभागातील सुज्ञ जनता हि माझ्याबरोबर असून विरोधकांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय गप्प बसणार नाही. कालच्या सभेत विकासशेठ माझ्याबद्दल जे बोलले त्यांना माझे एवढेच आव्हान आहे कि, तुम्ही माझं काही वाकडं करू शकत नाही. मी जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात प्रवेश केला तेव्हा या सर्व गोष्टींचा विचार करूनच निर्णय घेतला. मी घाबरणार नाही, तसेच माफी मागण्याचा किंवा तुमचा प्रचार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. विकासशेठ गोगावलेना माझी आव्हान आहे कि, तुम्ही आयजीच्या जीवावर बायजी आहात, तुमची बाप कमाई आहे. आम्ही स्वतःच्या हिमतीवर आमचे साम्राज्य उभे केले आहे. तुमचे वडील जर का आमदार नसते तर तुम्ही कुठे असता? तुमचे वडील आमदार नसते तर तुम्हाला कोणीही विचारले नसते. तुमची धमकी हि निश्चितच हास्यास्पद आहे.
कालच्या सभेत पोलादपूरचे आमचे मित्र आले होते ते काहीतरी बरगळत होते. माझे त्यांना आव्हान आहे कि, निजामपूरला तुम्ही मताधिक्य घेण्याची भाषा बोलता ते मताधिक्य या विभागातून घेऊन दाखवा मी राजकारण सोडून देईन. सातबाराचा बाबतीत आपण जे बोलता ते मला तुम्ही बोलायला लावू नका. २०१९ मध्ये आपण काय होतात, काय केलेत, कोणाला जवळ केलेत, कोणाशी तडजोड केली याचा साक्षीदार मी आहे. आम्ही हे सर्व उघड केले तर पोलादपूरची जनता तुम्हाला उभी देखील करणार नाही असा इशारा खानविलकर यांनी दिला. पुढे बोलताना खानविलकर म्हणाले, बऱ्याचशा वक्त्यांनी मुद्दे घेतले एकाने मतदार संघातील विकास कामाचा १५० पानांचा कार्य अहवाल छापला असल्याचे सांगून मतदार संघात ३६०० कोटी रुपयांचा निधी आणल्याचे मतदारांना भासवतात. यांनी जर का एवढी विकास कामे केली असतील तर त्यांच्या कुटुंबियांना मते मागण्यासाठी मतदार संघात का फिरावे लागत आहे. विरोधक हे खोटारडे असून मतदार संघातील जनतेची पूर्णपणे फसवणूक करीत आहे. विविध समाजाचे अध्यक्ष, गाव, कार्यकर्ते यांना विकत घेण्याचे प्रयत्न हे बाप-बेटे करीत आहेत. परंतु या मतदार संघातील सुज्ञ जनता त्यांना चांगलीच ओळखून आहे. मुलाच्या दमदाटीच्या भाषेला मतदार संघातील सारेजण कंटाळले आहेत. याचा वचपा काढण्यासाठी मतदार संघातील जनता येणाऱ्या वेळेची वाट पाहत आहेत.
आमच्या महाविकास आघाडीच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या उमेदवार स्नेहलताई जगताप या उच्च शिक्षित महिला असून त्या स्व. माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या सुकन्या आहेत. माणिकरावांनी सन २००४ मध्ये महाड मतदार संघाचे आमदार म्हणून निवडून आल्यावर या मतदार संघात उल्लेखनीय अशी विकासाची कामे केली. त्यांचा समाजकारणाचा आदर्श नजरेसमोर ठेऊन त्यांची कन्या स्नेहलताई जगताप यांनी महाड नगरपरिषदेवर निवडून आल्यावर नगराध्यक्षपदी त्यांची वर्णी लागल्यावर महाड नगरीचा सर्वांगीण सुंदर असा विकास त्यांनी साधला. या स्नेहलताईंना महाड मतदार संघातील माणगाव, महाड, पोलादपूर या तिन्ही तालुक्यांतून जनतेचा उत्स्फूर्त असा पाठिंबा मिळत असून त्यांचा विजय निश्चित असल्याचे खानविलकर यांनी शेवटी बोलताना सांगितले.