अखंडीत वीज सेवा पुरविण्याची जनतेची मागणी
विठ्ठल ममताबादे
उरण : अन्न, वस्त्र, निवारा याचबरोबर वीज सुद्धा आता अत्यावश्यक सेवा बनली आहे आज कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण हे विजे शिवाय चालूच शकत नाही. टीव्ही, मोबाईल, फॅन, कुलर, एसी, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वाहने आणि उपकरणे विजेशिवाय चालूच शकत नाहीत. विजेचा वापर आता सर्वत्र मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दिवसेंदिवस विजेची मागणी वाढतच चालली आहे. मात्र उरणमध्ये या अत्यावश्यक सेवेचे तीन तेरा वाजले आहेत.
गेली ४ ते ५ दिवस दररोज पहाटे उरण शहरात वीज बंद होत आहे. पहाटे पहाटे वीज पुरवठा बंद होत असल्यामुळे उरण शहरातील नागरिक हैराण झाले आहेत. सारखी वीज जात असल्याने घरातील टीव्ही, फ्रीज, एसी, कुलर आदी उपकरणे बंद पडत आहेत. याचा आर्थिक फटका विनाकारण ग्राहकांना बसत आहे. पहाटे कधी ४ वाजता तर कधी पहाटे ५ वाजता वीज घालविली जात असल्याने नागरिकांची मोठया प्रमाणात झोपमोड होत आहे. सारखी वीज जात असल्याने त्याचा परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. ग्राहकांना वीज बिले वेळेत दिली जातात. पैसे नाही भरले तर मीटर कापून नेले जाते. वीज पुरवठा बंद केला जातो. मात्र ग्राहकांनी वेळेत वीज बिल भरून सुद्धा ग्राहकांना महावितरणतर्फे विजेची चांगली सुविधा मिळत नसल्याने उरणमधील जनता महावितरणच्या कारभारावर प्रचंड प्रमाणात नाराज आहे.
दररोज पहाटे उरण शहरात वीज घालवली जाते. त्याचा नाहक त्रास जनतेला होत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम मानवी शरीरावर होत आहे. महावितरणतर्फे नियमितपणे, अखंडीत वीज पुरवठा झाला पाहिजे.
-शुभम उरणकर,
नागरिक, उरण.
सब स्टेशनचा रिलेचा प्रॉब्लेम झाल्याने पहाटे वीज जात होती. काही तांत्रिक कारणे सुद्धा होती. आता कामे पूर्ण झाली असून जनतेला कोणताही त्रास होणार नाही. कुठे बिघाड झाल्यास त्वरित कामे केली जात आहेत.
-संदीप चाटे,
अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महावितरण उरण