ऊबदार कपडे खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी, थंडीमुळे कधी फायदा तर कधी तोटा?
विश्वास निकम
कोलाड : संपूर्ण रायगड जिल्ह्यासह रोहा तालुक्यातील किमान तापमानाचा पारा १६ अंशाच्या खाली गेल्याने थंडीची हुडहुडी वाढल्याचे दिसत असुन यासाठी थंडी पासून उब मिळण्यासाठी लोकांनी ऊबदार कपडे खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसून येत आहे.

थंडीचा पारा हा १६ अंशाच्या खाली गेल्यामुळे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या लोकांची संख्या वाढली असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. यामुळे मधुमेह असणाऱ्या लोकांना याचा फायदा होऊ शकतो. पहाटे दवबिंदू पडलेल्या गवतावरून चालत जातांना शरीर तंदरुस्त होते. याशिवाय शरीरातील गर्मी, उष्णता, त्वचेवरील दाह कमी होतो. तसेच शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत चालते. थंडीच्या दिवसात निसर्गाच्या सानिध्यात चालणे फायदेशीर ठरते, परंतु प्रदूषणामुळे हवा हि दूषित झाली आहे. धुक्यात चालणे हि अवघड असते यामुळे तज्ञाच्या मते वेळ महत्वाचा आहे. सकाळी ७ ते ९ वा. मॉर्निंग वॉकला तर संध्याकाळी ४ ते ६ वाजता इव्हिनिंग वॉकला जाण्यासाठी योग्य वेळ आहे. तर चुकीच्या वेळेत मार्निंग वॉकला गेल्याने शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. यामुळे सर्दी, खोकला, दमा यासारखे आजार डोके वर काढतात.
वाढलेल्या थंडीच्या हुडहुडीमुळे काही फायदे तर काही तोटे हि होतांना दिसत असुन यामुळे योग्य ती काळजी घेणे महत्वाचे आहे. तसेच काही दिवसांनी किमान हवामानात आणखी घट होऊन अधिक थंडी वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली असुन योग्य ती खबरदारी घेणे महत्वाचे आहे.