घन:श्याम कडू
उरण : द्रोणागिरी डोंगरालागत असलेल्या डाऊरनगर येथील वस्ती जवळी दरड कोसळली होती. यामध्ये कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून तहसीलदार उद्धव कदम यांनी जातीने लक्ष घालून आज डोंगरावर धोकादायक वाटणारे दगड व माती नागरी संरक्षण दल व स्थानिकांच्या मदतीने काढण्यात आली.

इर्शालवाडीवर दुर्घटना होऊन त्यामध्ये कित्येक जणांचा बळी गेला आहे. अशा प्रकारच्या अनेक वाड्या या डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या आहेत. उरणमधील द्रोणागिरी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या डाऊरनगर येथील दरड कोसळण्याची घटना घडली होती. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतिहानी अथवा वित्तहानी झाली नाही. परंतु याबाबत आपत्कालीन मदतीसाठी असलेल्या ग्रुपचे सदस्य, नागरी संरक्षण दल पदाधिकारी व उरण तालुका मराठी पत्रकार संघाने तहसिलदार उद्धव कदम यांच्याशी संपर्क साधून खबरदारी घेण्याची मागणी केली. त्यानंतर घटनास्थळी मंडळ अधिकारी व तलाठी यांना पाठवून पहाणी करण्यास सांगितले.
त्यानंतर तहसीलदार उद्धव कदम यांनी आज सकाळपासून संरक्षण दल व स्थानिकांच्या मदतीने द्रोणागिरी डोंगरावरील धोकादायक ठरणारे दगड व माती काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यामुळे सध्या तरी धोका टळला आहे. तहसीलदार उद्धव कदम यांनी तत्परतेने मोहीम हाती घेतल्याबद्दल व घटनास्थळी काम करणाऱ्या नागरी संरक्षण दल, स्थानिक जनतेला तेथील रहिवासी धन्यवाद देत आहेत.