सलीम शेख
माणगाव : पावसाळा सुरू झाल्यानंतर मुंबई गोवा महामार्गाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. गेल्या काही दिवसात संततधार पडणाऱ्या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे महामार्गाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन वाहन चालकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी वैश्यवाणी नव तरुण युवक मंडळ तळवळीच्या नवतरुणांनी श्रमदानाने भुवन ते तळवली या गावादरम्यान असलेले खड्डे भरले आहेत.
या खड्यांमुळे या ठिकाणी अनेक अपघात होत होते. गावासमोर पावसामुळे खुप मोठमोठे खड्डे झाले होते. त्यामुळे येणाऱ्या- जाणाऱ्या सर्व वाहनांना त्रास होत होता. महामार्गावर बरेच दिवस खड्डे पडलेले आसून कोणीही त्या कडे लक्ष देत नव्हते. यामुळे या तरुणांनी श्रमदान करून खड्डे बुजविले असल्याने वाहन चालकांचा त्रास काही अंशी कमी झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करून तरुणांच्या कार्याचे कौतुक केले आहे.