• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

श्रीवर्धन प्रशासनाचा पीएम योजनेकडे कानाडोळा!

ByEditor

Dec 12, 2024

पात्र शेतकऱ्याला कृषी, महसूल विभागातून उडवाउडवीची उत्तरे

गणेश प्रभाळे
दिघी :
श्रीवर्धन तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना हा एक महत्त्वाचा आधार मिळत होता. मात्र, गेल्या वर्षभरात प्रशासनाकडून या योजनेकडे कानाडोळा होत असल्याने हजारो शेतकरी लाभापासून वंचित झाले आहेत.

कृषी विभागाकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी लाभार्थ्यांना केवायसी व आधार अपडेट न केल्यास त्यांची नावे योजनेतून वगळण्यात येतील असे आवाहन करण्यात आले. मात्र, त्याचवेळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भूखंड नोंदी सर्व्हेक्षनातून चुकीच्या झाल्याने शेकडो लाभार्थी सन्मान निधीपासून वंचित झाले आहेत. प्रशासनाच्या आडमुठे धोरणामुळे अल्पभूधारक, ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला तसेच शेतीवरच आपलं उदरनिर्वाह असणाऱ्या तालुक्यातील ९०० हून अधिक पात्र शेतकरी वंचित असून त्यांच्यावर हलाखीच्या परिस्थितीत कुटुंब चालवण्याची वेळ आली आहे.

मागील दिवसात सर्व्हेक्षण करताना या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची विदा संगणक प्रणालीतून माहिती भरताना शासनाच्या कर्मचाऱ्यांनी भू नोंदणीत खूप मोठी चूक केली असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे मिळणारा लाभ बंद झाला आहे. आता नेमका न्याय कुणाकडे मागायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

यामध्ये अनेक शेतकऱ्यांना नियमित मिळणारा आर्थिक लाभ दीड वर्षापासून बंद आहे. तालुक्यात दुर्गम भाग मिळून जवळपास ८० गावांची संख्या आहे. येथील प्रत्येक कुटुंब पशुपालन तसेच शेती व्यवसायात जोडला आहे. मात्र, आता या योजनेचा मिळणारा लाभ बंद झाल्याने येथील शेतकरी दिघी ते हरिहरेश्वर या टोकापासून १७ ते ३० किलोमीरवरील अंतरात ये – जा करून तहसील विभाग तर कधी कृषी कार्यालयात जाऊन हेलपाटे मारत आहे.

घर, शेती खर्चासाठी या रकमेचा शेतकरी उपयोग करतो. पीएम किसान योजनेसाठी पात्र असुनही लाभ मिळत नाही. महसूल अधिकाऱ्यांचे या योजनेवर नियंत्रण नाही. तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी या योजनेविषयी शेतकऱ्यांना योग्य माहिती देत नाहीत. त्यामुळे स्थानिक प्रशासना विरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

एकमेकांकडे बोट?

लाभ मिळावा म्हणून शेतकरी तहसीलदार कार्यालय, कृषी सहाय्यक विभागात हेलपाटे मारत आहेत. ग्रामपंचायत, ई सेवा केंद्र तसेच जिल्हा बँकेत फेऱ्या मारून मेटाकुटीला आला आहे. तहसील विभागातून कृषी विभागात जा सांगतात. तर कधी केवायसीचा बागुलबुवा पुढे करून पिटाळून लावले जात आहे. त्यामुळे येथील शेतकरी त्रस्त झाला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!