विनायक पाटील
पेण : येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात “आई महाविद्यालयीन भेटीला” या शीर्षकाखाली पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. महिला विकास कक्ष आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालय विकास समितीचे सदस्य ॲड. विकास म्हात्रे हे उपस्थित होते. विद्यार्थी व पालकांना संबोधित करताना त्यांनी विशेष मार्गदर्शन केले. समंजस आणि सुजाण नागरिक हीच खरी देशाची संपत्ती असून विद्यार्थी हा बहुगुणी असणे आवश्यक आहे. या महाविद्यालयाने अनेक गुणवंत विद्यार्थी घडवले असून ती परंपरा अबाधित ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. पालकांनी आपल्या पाल्याच्या संदर्भात जागरूक असणे गरजेचे आहे असे प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुरलीधर वाघ हे होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य वाघ यांनी विद्यार्थी घडवण्यासाठी समाज, कुटुंब, मित्र, आणि शाळा महाविद्यालये हे सर्व घटक महत्त्वाचे आहेत. पालक आणि शिक्षक यांच्या संयुक्त निगराणीतच शिक्षणाचा अंतिम हेतू साध्य होऊ शकतो. याप्रसंगी उपस्थित पालकांची ही काही प्रासंगिक मनोगते झाली. याशिवाय प्राजक्ता सागवेकर आणि योगिनी पाटील यांचीही याप्रसंगी मनोगते झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयवंती अडलीकर यांनी केले. तर आभार प्रा. डॉ. उषाताई मगरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. विनायक पवार यांनी केले.