अनंत नारंगीकर
उरण : एकीकडे हजारो कोटी रुपये खर्च करुन दरवर्षी लाखो नव्या झाडांची लागवड करण्याची मोहीम शासनाने हाती घेतलेली असताना, दुसरीकडे विकासाच्या नावाखाली हजारो झाडांची विकासाच्या नावाखाली कत्तल करुन या मोहिमेला उरण तालुक्यात वन विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे हरताळ फासला जात आहे. सध्या रानसई धरण ते दिघोडे-चिर्ले रस्त्यालगत नव्याने पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु आहे. दरम्यान,पाईप लाईन टाकण्याच्या कामात अडथळा ठरणार्या अनेक झाडांची कत्तल खुलेआम करण्यात येत आहे.त्यामुळे कडक उन्हाळ्यात सदर रस्त्यावर पडणारी झाडांची सावली गायब होणार असून प्रदुषणात वाढ होणार आहे.तरी वन विभागाने यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा जेणेकरून रस्त्यावरील सावली गायब होणार नाही अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

उरण तालुक्यात औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे तालुक्यातील पर्यावरणाचा ऱ्हास झपाट्याने होत असल्याने रहिवाशांना विविध प्रकारच्या आजारांचा सामना करावा लागत आहे. यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने सामाजिक वनीकरण, माझी वसुंधरा सारख्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, शासनाच्या, वन विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या योजनांचा बोजवारा उडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच कोणत्याही प्रकारचे नियोजन न करता सध्या एमआयडीसीच्या देखरेखीखाली करोडो रुपये खर्च करून नव्याने पाईप लाईन टाकण्याचे काम हे रानसई धरणापासून केले जात आहे. परंतु नव्याने टाकण्यात येत असलेल्या पाईपलाईनचे काम हे दिघोडे-चिर्ले रस्त्यालगत लागवड केलेल्या विविध जातींच्या झाडांच्या जीवावर बेतू लागले आहे. त्यामुळे आँक्सिजनचा पुरवठा करणारी झाडे जमिनदोस्त होत असल्याने कडक उन्हाळ्यात पडणारी झाडांची सावली गायब होणार असून प्रदुषणात वाढ होणार आहे. तरी एमआयडीसी व वन विभागाने यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा जेणेकरून रस्त्यावरील सावली गायब होणार नाही आणि पर्यावरणाची हानी होणार नाही. अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.