घन:श्याम कडू
उरण : रविवारी मंत्रीमंडळाचा शपथविधी संपन्न झाला. या मंत्रीमंडळात रायगडमधील महायुतीमधील शिवसेना (शिंदे) मधील भरत गोगावले तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) मधील आदिती तटकरे यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. तर भाजपामधून कोणाचाही समावेश मंत्रीमंडळात न केलयाने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर निघत आहे. आता पालकमंत्री कोण होते? याकडे लक्ष लागले असून पुन्हा एकदा पालकमंत्री म्हणून आदिती तटकरे यांची निवड होण्याची शक्यता दिसत आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला निर्विवाद बहुमत मिळाले होते. त्यामुळे मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री पदी अजित पवार व एकनाथ शिंदे यांचा शपथविधी झाला होता. त्यानंतर रविवारी मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले आहे. त्यामध्ये रायगडमधून शिवसेना शिंदे गटाचे भरत गोगावले व राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) आदिती तटकरे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार निवडून येऊनही कॅबिनेट मंत्री होतो, मात्र भाजपचे तीन आमदार निवडून येऊनही त्यांचा मंत्रीमंडळात समावेश झालेला नाही. यामुळे जिल्ह्यातील भाजपा समर्थकांमध्ये नाराजीचा सूर निघत आहे. आता रायगडचा पालकमंत्री कोण होणार? याकडे लक्ष लागले आहे. मात्र राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांचे वजन असल्याने व आदिती तटकरे या तटकरे यांची मुलगी असल्याने त्यांचीच पुन्हा एकदा रायगडच्या पालकमंत्री म्हणून निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये आदिती तटकरे यांची पालकमंत्री म्हणून निवड केल्याचा ठपका ठेवून जिल्ह्यातील तीन आमदार एकनाथ शिंदेंबरोबर सत्तेतून बाहेर पडले होते. पुन्हा आदिती तटकरे पालकमंत्री झाल्या तर शिवसेनेचे हे तीन नवनिर्वाचित आमदार काय भूमिका घेतात? याकडे रायगडवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.