मुंबई : ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक शिरीष कणेकर यांचं आज (25 जुलै) निधन झालं. मुंबईतील हिंदुजा रूग्णालयात त्यांनी 80 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कणेकरांच्या निधनानं पत्रकारिता, साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांचं निधन हृदयविकाराच्या झटक्याने झालं असल्याचे समजते.
शैलीदार लेखक आणि फिल्मी गप्पांची मैफल रंगविणारे बहारदार वक्ते अशी शिरीष कणेकर यांची ओळख. सिनेमा, क्रिकेट आणि राजकारणावरील त्यांचे वृत्तपत्रांतील स्तंभ प्रसिद्ध आहेत. तर ‘कणेकरी’, ‘फिल्लमबाजी’, ‘शिरीषासन’ हे त्यांचे विनोदी लेख प्रसिद्ध आहेत. शिरीष कणेकर यांच्या निधनानंतर पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
शिरीष कणेकर यांनी मुंबई विद्यापीठातून एलएलबी (LLB) केलं. पत्रकार म्हणून त्यांनी इंडियन एक्स्प्रेस, फ्री प्रेस जर्नल या प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्रांतून काम केलं आहे. याशिवाय लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सामना आणि जवळपास सगळ्याच मराठी वृत्तपत्रांतील त्यांचे स्तंभलेखन प्रसिद्ध होते. त्याचप्रमाणे साप्ताहिक मनोहर, लोकप्रभा, चित्रलेखामधील त्यांचे लेख प्रसिद्ध आहेत. ‘लगाव बत्ती’ या त्यांच्या कथासंग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट विनोदी वाङ्मयाचा चिं.वि. जोशी पुरस्कार मिळाला होता.
रायगड जिल्ह्यातील पेण हे शिरीष कणेकर यांचं मूळ गाव. त्यांचे वडील रेल्वेमध्ये डॉक्टर होते. त्यामुळे भायखळ्याच्या रेल्वे रुग्णालयाच्या सरकारी निवासस्थानात त्यांचं बालपण गेलं. शिरीष कणेकर हे मराठीतील ज्येष्ठ लेखक, पत्रकार आणि कथाकथनकार होते. क्रीडा आणि सिने-पत्रकारितेवर त्यांनी खूप लेखन केलं आहे.