• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबईच्या वडापावने वाचवले संपूर्ण कुटुंबाचे लाखमोलाचे जीव…

ByEditor

Dec 20, 2024

घनःश्याम कडू
उरण :
मुंबईमधील गेट वे ऑफ इंडियाजवळ समुद्रात स्पीड बोटने फेरी बोटला धडक दिल्याने 13 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. नौदलाच्या स्पीड बोटने दिलेल्या धटकेमध्ये गेट वे ऑफ इंडियावरुन एलिफंटाला जाणार्‍या ’नीलकमल’ बोटीला जोरदार धडक दिल्याने ही बोट पलटली. या बोटीमधील 11 पर्यटकांबरोबरच नौदलाच्या स्पीड बोटीवरील 3 जणांना जलसमाधी मिळाली. या बोटीवरील 98 प्रवाशांना वाचवण्यात यश आलं असून दुसर्‍या दिवशीही बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरु आहे.

या बोट अपघातामध्ये मरण पावलेल्यांबरोबरच बचावलेल्यां संदर्भातील धक्कादायक खुलासे समोर येत असतानाच एक कुटुंब मुलाच्या हट्टापायी या अपघातातून वाचल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघाग्रस्त बोटमधून एलिफंटाला जाण्यासाठी उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथील अंजली त्रिपाठी आणि त्यांचे कुटुंबीय मुंबईमध्ये फिरण्यासाठी आले होते. हे सर्वजण नीलकमल फेरीबोटीमधून लेणी पाहण्यासाठी जाणार होते. संपूर्ण कुटुंबाने या फेरीबोटची तिकीटं देखील काढली होती. ते बोटीमध्ये चढण्यासाठी गेट वे ऑफ इंडियाजवळ पोहचलेही होते. मात्र ते बोटीत चढणार इतक्यात त्यांच्या कुटुंबातील चिमुकल्यांनी मुंबईचा वडापाव खाण्याचा हट्ट धरला.

चिमुकल्यांना वडापाव खायचा होता म्हणून सर्वांनीच वडापाव खाण्याचं ठरवलं आणि ते गेट वे ऑफ इंडियापासून काही अंतरावर असलेल्या वडापावच्या गाडीवर वडापाव खाण्यासाठी थांबले. वडापावच्या या हट्टामुळे त्यांची फेरीबोट सुटली आणि त्यांच्यापैकी कोणीच या बोटवर चढू शकलं नाही. मुलांनी केलेल्या वडापावच्या हट्टामुळेच आमचं संपूर्ण कुटुंब या धक्कादायक अपघातामध्ये सापडलं नाही, असं अंजली त्रिपाठी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. या 15 रुपयांच्या वडापावने त्रिपाठी कुटुंबाचे लाखमोलाचे जीव वाचवले असेच या घटनाक्रमातून दिसून येत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!