• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कॅन्सरग्रस्त रुग्णांना मदत करणारे बोडणी येथील भानुदास कोळी यांची गळफास घेऊन आत्महत्या

ByEditor

Dec 25, 2024

अब्दुल सोगावकर
सोगाव :
अलिबाग तालुक्यातील बोडणी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. बोडणी येथील भानुदास लक्ष्मण कोळी (४८) यांनी सोमवार, दि. २३ डिसेंबर रोजी अज्ञात कारणावरून आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गळफास घेतल्यानंतर त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे. याबाबत सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर माहिती देताना मांडवा सागरी पोलिसांनी सांगितले की, बोडणी येथील भानुदास लक्ष्मण कोळी (वय ४८) यांनी त्यांच्या बोडणी येथील राहत्या घरी सोमवार दि. २३ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास अज्ञात कारणावरून पंख्याच्या हुकाला गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावेळी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमने भानुदास यांचा जीव वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यावेळी जिल्हा रुग्णालयात त्यांच्या नातेवाईक व मित्रपरिवांनी एकच गर्दी केली होती. रात्री उशिरा शवविच्छेदन करण्यात येऊन दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी नऊ वाजता बोडणी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारावेळी राजकीय व सामाजिक क्षेत्रातील तसेच नातेवाईक, मित्रपरिवार आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, ४ मुली, भाऊ असा मोठा परिवार आहे. याबाबत अधिक तपास मांडवा सागरी पोलीस करत आहेत.

मयत भानुदास कोळी हे आपल्या लहान टेंपोद्वारे बोडणी भागात पिण्याचे पाणी पुरवठा करण्याचा व्यवसाय करत होते, तसेच ते अलिबाग तालुक्यासह इतर भागातील कॅन्सरग्रस्त रुग्णांना मुंबई येथील टाटा रुग्णालयात एक समाजसेवा म्हणून घेऊन जात उपचारासाठी मदत करण्याचे महान कार्य गेल्या काही वर्षांपासून ते करत होते. त्यांच्या या आकस्मिक निधनाबद्दल त्यांनी मदत केलेल्या अनेक रुग्णांनी मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली आहे.

यावेळी भानुदास कोळी यांचे मित्र, सामाजिक कार्यकर्ते तथा किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांनी आपल्या मोठ्या भावासारखा असणारा आमचा भानुदासदादा आम्हाला अचानक सोडून गेला, त्याची निर्माण झालेली पोकळी ही कधीही न भरून येणारी आहे, असे सांगत मोठा शोक व्यक्त केला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!