बोटचालक व स्थानिक व्यवसायिक चिंताग्रस्त
अनंत नारंगीकर
उरण : नाताळाच्या सुट्टीत व सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी देश परदेशातील हजारो पर्यटकांची पावले ही कोकण किनारपट्टीवरील निसर्गाचा आनंद लुटण्याकडे व मुंबई शहर तसेच जागतिक किर्तीच्या घारापुरी बेटावरील लेणी पाहण्यासाठी वळतात. मात्र, दि. १८ डिसेंबर रोजी घारापुरी बेटाकडे प्रवाशी नागरिकांना घेऊन जाणाऱ्या निलकमल या बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्याने झालेल्या दुर्घटनेत प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यामुळे नाताळाच्या सुट्टीत या दुर्घटनेचा फटका हा अलिबाग, मांडवा बंदर आणि घारापुरी बेटाकडे जाणाऱ्या जल पर्यटनाला बसला असून स्थानिक व्यावसायिक आणि बोट चालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या उरण तालुक्यात लेण्यांचे शहर म्हणून घारापुरी (एलिफंटा) बेटानी आपल्या नावाची ओळख ही देश परदेशातील हजारो पर्यटकांच्या हृदयात निर्माण केली आहे. त्यामुळे मुंबई, कोकण किनारपट्टीवरील निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येणारे हजारो पर्यटकांची पावले ही दरदिवशी आपआपल्या कुटुंबासह घारापुरी बेटावर वळतात. याचा फायदा हा कोकणातील, घारापुरी बेटावरील गोरगरीब व्यवसायिकांना तसेच बोट चालकांना होत असतो. मात्र, बुधवारी (दि. १८) मुंबई शहरातून घारापुरी बेटाकडे प्रवाशी नागरिकांना घेऊन जाणाऱ्या निलकमल या बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्याने झालेल्या दुर्घटनेत प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यामुळे नाताळाच्या सुट्टीत या दुर्घटनेचा फटका हा अलिबाग, मांडवा बंदर आणि घारापुरी बेटाकडे जाणाऱ्या जल पर्यटनाला बसला असून स्थानिक व्यावसायिक आणि बोट चालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

देशाचे महत्वाचे शहर म्हणून मुंबई शहर पाहण्यासाठी आणि जागतिक किर्तीचे लेण्यांचे शहर म्हणून घारापुरी बेट पाहण्यासाठी देशातील व परदेशातील हजारो पर्यटकांची रेलचेल ही दरदिवशी या ठिकाणी असते. नुकतीच बोट दुर्घटनेची बातमी आम्ही टिव्ही वर पाहिली, तरी पण आम्ही कुटुंब घाबरून न जाता नाताळाच्या सुट्टीत मुंबई शहर व घारापुरी बेटावरील लेणी पाहण्यासाठी आलो आहोत. परंतु अशा दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रशासनाने, बोट चालकांनी खबरदारी घेऊन शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असून घारापुरी बेटावरील लेणी येथील निसर्ग सौंदर्याचा आनंद वेगळाच अनुभवास मिळत आहे.
-समिर पाटील
पर्यटक, ठाणे
देश परदेशातील पर्यटक नाताळाच्या सुट्टीत घारापुरी बेटावरील लेणी पाहण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने आपआपल्या कुटुंबासह येतात. मात्र नुकताच झालेल्या बोट दुर्घटनेमुळे तेवढ्या प्रमाणात पर्यटक आले नाहीत. त्याचा फटका काही अंशी स्थानिक व्यवसायिकांना बसला असला तरी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षात निश्चित हजारो पर्यटकांची पावले ही घारापुरी बेटावरील लेणी पाहण्यासाठी व येथील निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी वळतील. त्याच्या स्वागतासाठी आज आणि उद्याही घारापुरी ग्रामपंचायत व ग्रामस्थ एकदिलाने पुढाकार घेतील.
-बळीराम ठाकूर
उपसरपंच, घारापुरी