अनंत नारंगीकर
उरण : मुंबई शहराकडे जाणाऱ्या अटक सेतू, उलवे नोड, आणि रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या जासई नाका ते गव्हाण गाव या मुख्य रस्त्याचे काँक्रीटकरण करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग उरणचे उप अभियंता नरेश पवार यांनी हाती घेतल्याने प्रवाशी नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.

मुंबई शहराकडे जाणाऱ्या अटक सेतू, उलवे नोड आणि या ठिकाणावरील रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या जासई नाका ते गव्हाण गाव या मुख्य रस्त्यावर पावसाळ्यात मोठं मोठे खड्डे पडून रस्त्याची दुरवस्था होत असल्याने वाहन चालक, प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असे. यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्रशेठ घरत, शेकापचे युवा नेते रमाकांत म्हात्रे यांनी वारंवार संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा केला. तसेच रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण करण्याची मागणी केली होती. त्या मागणीची दखल सार्वजनिक बांधकाम विभाग उरणचे उप अभियंता नरेश पवार यांनी घेऊन आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाकडून निधी उपलब्ध करून घेतला आणि के. एन. घरत या कंपनीच्या माध्यमातून सदर रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण करण्याचे काम सुरू केले. आज सदर रस्ता हा खड्डेमुक्त झाल्याने वाहन चालक, प्रवाशांनी समाधान व्यक्त करत या रस्त्याच्या कामासाठी पुढाकार घेणाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहेत.