मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची सरसकट छाननी होणार नसून ज्या लाभार्थ्यांविषयी तक्रारी येतील त्यांचीच छाननी होईल, असे स्पष्टीकरण महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहे. योजनांच्या निकषांमध्ये बसत नसूनही काही महिला त्याचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत असून अशा तक्रारींवरच कार्यवाही करण्यात येत असून निकषांमध्ये कुठेही बदल होणार नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला.
महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली. त्याचा प्रभाव निवडणुकीत दिसून आला आणि जनतेने पुन्हा त्यांना निवडून दिले. मात्र, सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी करण्याचे संकेत दिले होते. त्यावरून विरोधकांनीही ही योजना बंद करण्यासाठी लाभार्थ्यांची नावे वगळण्यास सुरुवात होत असल्याचे आरोप केले होते. ‘सध्या राज्यातील २.५० कोटी महिला योजनेच्या लाभार्थी आहेत. योजनेतील सर्व लाभार्थ्यांची सरसकट पडताळणी करण्यात येणार नाही, तसेच योजनेचे निकषही बदलण्यात येणार नाही. परंतु, ज्या लाभार्थ्यांविषयी स्थानिक पातळीवर तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत त्यांचीच फक्त छाननी होणार आहे’, असे त्यांनी सांगितले.
‘काही लाभार्थ्यांचे उत्पन्न वर्षाला अडीच लाखांहून जास्त आहेत तर काही लाभार्थी महिलांकडे चारचाकी वाहन असल्याच्याही तक्रारी आहेत, अशा लाभार्थींची पडताळणी आयकर तसेच परिवहन विभागाकडून मागविण्यात आली आहे. तसेच काही लाभार्थ्यांचेच एकापेक्षा अधिक अर्ज दाखल आहेत. आधार क्रमांक आणि बँक खाते यांची पडताळणी होत नाही. तर लग्न होऊन महाराष्ट्राबाहेर गेलेल्या महिलाही या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. तर काही महिलांनी खोट्या कागदपत्रांचा आधार घेतल्याच्या तक्रारीही आम्हाला मिळाल्या आहेत’, असे त्या म्हणाल्या.