• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

“योग्यवेळी योग्य निर्णय घेणार”, ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांचं मोठं विधान; पक्ष बदलाचे दिले संकेत

ByEditor

Jan 3, 2025

रत्नागिरी : राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी हे शिवसेना ठाकरे गट सोडणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत राजन साळवी यांचा किरण सामंत यांनी पराभव केला. या पराभवानंतर राजन साळवी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षावर नाराज असल्याचं बोललं जात आहे. मात्र, पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांवर राजन साळवी यांनी गुरुवारी (२ डिसेंबर) पत्रकार परिषद घेऊन या चर्चांना पूर्णविराम दिला होता.

‘मी नाराज असल्याच्या चर्चा आहेत, मात्र, पण तसं काही नाही’, असं स्पष्टीकरण राजन साळवी यांनी दिलं होतं. मात्र, आज राजन साळवी यांनी माध्यमांशी संवाद साधत पक्ष बदलाचे संकेत दिले आहेत. “मी योग्यवेळी योग्य निर्णय घेईन”, असं स्वत: राजन साळवी यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानामुळे उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.

“गेल्या काही दिवसांपासून प्रसार माध्यमांच्या माध्यमातून माझ्या प्रवेशासंदर्भात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मला कार्यकर्त्यांचा आग्रह होता की आपण यावं आणि संवाद साधावा. मी काल राजापूर या ठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तेव्हा सर्वांनी भावना व्यक्त केल्या की माझ्यावर अन्याय झाला आहे. माझ्या पराभवाला अनेक मंडळी कारणीभूत आहेत. तसेच तुम्ही योग्य तो निर्णय घ्या, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. त्यांना मी देखील सांगितलं की, मी योग्यवेळी योग्य निर्णय घेईन. तसेच आज लांजा येथील पदाधिकाऱ्यांनी मला बोलावलं होतं. मी या ठिकाणीही आलो कार्यकर्त्यांशी संवाद साधला. माझ्या भावना मी त्यांच्याबरोबर व्यक्त केल्या. यावेळी निश्चितच भविष्यात योग्यवेळी योग्य तो निर्णय घेईन असं मी त्यांना सांगितलं आहे”, असं राजन साळवी यांनी स्पष्ट केलं.

“माझ्या पराभवाला काही वरिष्ठ मंडळी कारणीभूत आहेत. मी आज त्यांचं नाव घेऊ इच्छित नाही. मात्र, कोण आहे हे शोधणं गरजेचं आहे. आज पक्षावर आणि माझ्यावरही दु:खाचा डोंगर आला. यासाठी कोण कारणीभूत आहे हे शोधणं गरजेचं आहे. जर शोधलं नाही तर आता माझ्यावर जी वेळ आली, तीच वेळ भविष्यात आणखी कोणावर येऊ शकते. मात्र, अशी वेळ येऊ नये, यासाठी योग्य तो निर्णय घेतला पाहिजे आणि मी योग्यवेळी योग्य निर्णय घ्यायला सक्षम आहे. माझ्या मतदारसंघातील अनेकांनी मला सांगितलं की तुम्ही योग्य निर्णय घ्या आम्ही तुमच्याबरोबर आहोत”, असं राजन साळवी यांनी म्हटलं.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!