• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

प्रख्यात कीर्तनकार पुरुषोत्तम पाटील महाराज अनंतात विलीन

ByEditor

Jan 5, 2025

साश्रू नयनांनी अखेरचा भावपूर्ण निरोप

शशिकांत मोरे
धाटाव :
रायगड भुषण प्रख्यात कीर्तनकार पुरुषोत्तम पाटील महाराज उर्फ (बापू) यांचे शनिवारी दि. ४ जानेवारी रोजी पहाटे धाटाव येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी डोलवी येथे सायंकाळी ९ वाजता हजारो चाहत्यांच्या साक्षीने जड अंतकरणाने अंत्यसंस्कार करून अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्या अंत्यसंस्कारप्रसंगी सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, राजकीय क्षेत्रासह वारकरी सांप्रदायिक, ज्येष्ठ नागरिक, तरुणवर्ग, महिला वर्गाची मोठी गर्दी पहावयास मिळाली. बापूंच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण रायगडमधील वारकरी सांप्रदायावर शोककळा पसरली आहे.

ज्येष्ठ किर्तनकार हभप पुरुषोत्तम पाटील महाराज यांच्या निधनाची बातमी संपूर्ण महाराष्ट्रासाठी दुःखदायक आहे. रायगडमधील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या कीर्तनाची ख्याती केवळ रायगडातच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरली होती. अशा थोर बापूंना भावपूर्ण श्रद्धांजली असे भावूक उद्गार महिला बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी काढले.

किर्तनकलेचा खऱ्या अर्थाने परिपूर्ण आविष्कार, असंख्य भाविकभक्तांचे श्रद्धास्थान आणि आधुनिक काळातील माऊली महावैष्णव तसेच वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू प. पू. गुरुवर्य पुरुषोत्तम पाटील महाराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायाची अपरिमित हानी झाली. परमेश्वर त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि भक्तगणांना या दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो हीच प्रार्थना, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे म्हणाले.

बापूंनी रोह्याच्या वारकरी संप्रदायाचा डोलारा एका नव्या आणि मोठ्या उंचीवर नेवून ठेवण्यात प्रचंड मेहनत घेतली. केवळ तालुक्या पुरता न राहता सबंध जिल्ह्यात, महाराष्ट्रात त्यांनी नावलौकीक मिळविला. कोकण दिंडी आणि आळंदीच्या धर्मशाळेसाठी त्यांनी योगदान दिले. तरुणांना चांगला मार्ग दाखविला आणि वारकरी प्रवाहात आणण्याचे मोठे काम त्यांनी केले. सांप्रदाय कार्याची कास त्यांच्याशिवाय अधुरीच वाटेल असे कोकण दिंडीचे महादेव सानप बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले.

कीर्तनाच्या माध्यमातून केलेले प्रबोधन एका नव्या परिवर्तनाकडे घेऊन जाण्याची त्यांची कला लहानपणापासून पहायला मिळाली. धार्मिक कार्याची सांगड घालून आमच्या गावच्या विकासासाठी त्यांचे योगदान खूपच मोलाचे ठरले. त्यांचा सहवास हाच आमचा उत्साह असायचा. त्यांचा रायगड जिल्ह्यात वारकरी सांप्रदाय वाढविण्यासाठी अतिशय मोलाचा वाटा होता. त्यांच्या अचानक जाण्याने गावावर मोठा आघात झाला आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विनोद पाशिलकर यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

त्यांच्या अचानक जाण्याने वारकरी सांप्रदायाचा आधारवड हरपल्याने अनेकांनी शोक व्यक्त केला. त्यांचे दशक्रिया विधी सोमवार, दि. १३ जानेवारी २०२५ रोजी आळंदी येथे तर अंतिम विधी उत्तरकार्य विधी गुरुवार, दि. १६ जाने २०२५ रोजी धाटाव येथील राहत्या निवासस्थानी करण्यात येणार आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!