ग्राम संवर्धन सामाजिक संस्था आणि रॅलीस इंडियाचा पुढाकार
पेण : तहसीलदार कार्यालय पेण, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण, रॅलीज इंडिया लिमिटेड आणि ग्राम संवर्धन सामाजिक संस्था, बांधनवाडी पनवेल यांच्या वतीने सोमवार, दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी तहसील कार्यालयातील सरदार वाघोजी तुपे सभागृहामध्ये आदिवासी बांधवांसाठी जातीचे दाखले नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. पेण तहसीलदार तानाजी शेजाळ, ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील निरीक्षक महेंद्र चोगले, नायब तहसीलदार नितीन परदेशी, रॅलीज इंडियाचे श्रीकांत म्हात्रे यांनी या शिबिराचे उद्घाटन केले.

आदिवासी ठाकर समाजाचे जातीचे दाखले मिळवण्यासाठी 1950चे पुरावे मागितले जातात त्यामुळे आजही हजारो ठाकूर समाजाचे आदिवासी बांधव जातीच्या दाखल्यापासून वंचित आहेत व जातीचे दाखले नसल्यामुळे या समाजाला कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे जातीचा दाखला मिळविण्यासाठी ठाकर समाज बांधव सरकारी कार्यालयाचे खेटे घालून थकून जातात, परंतु दाखले मिळत नाही. म्हणूनच यावेळी एकाच छताखाली महसूल विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या प्रतिनिधींनी एकत्रित येऊन एकच हाताखाली दाखल्यांसाठी लागणारे दस्तावेज जागेवरच देऊन तेथेच परिपूर्ण अर्ज भरून तहसीलदारांकडे जमा करण्यात आले. यावेळी 248 आदिवासी बांधवांचे जातीचे दाखले अर्जुन नोंदणी करण्यात आली.
कामार्ली मंडळ अधिकारी किरण जुईकर, तलाठी अनघा म्हात्रे, ग्राम संवर्धन समितीचे यशवंत खाकर, नरेश कडू, सुनील वाघमारे, गीता वाघमारे, भारती शिद, रवीना निरगुडा, यमुना शिद, विशाल हीलम, रिया वाघमारे, काळ्या कडू व ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते राजू पाटील, मानसी पाटील, राजेश रसाळ, उपासना म्हात्रे यांनी अथक मेहनत घेतली. पेण तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायतमधील तांबडी, उंबरमाळ, खाऊसाची वाडी, काजूची वाडी आणि केळीच्या वाडीतील आदिवासी बांधवांनी सदर शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद नोंदवला.