साहित्यरत्न पुरस्कार, कुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
प्रतिनिधी
अलिबाग : अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई ही संस्था गेली अनेक वर्ष मराठी भाषा उन्नतीसाठी अविरतपणे कार्यशील आहे. ह्या संस्थेचे अध्यक्ष हभप शिवाजीराव खैरे आहेत. ह्या संस्थेशी संबंधित काही शेकडो स्पर्धक आहेत. संस्थेतर्फे अक्षरमंच काव्यलेखन स्पर्धा या नावाने दरमहा दिलेल्या तीन विषयांपैकी एका विषयावर काव्यलेखन लिहून स्पर्धेत भाग घेणे आवश्यक असते. ही स्पर्धा 12, 24, 36, 48 आणि 60 महिने देता येते. ह्या स्पर्धा यशवस्वीरीत्या पार केल्यास दरवर्षी अष्टपैलू राज्यस्तरीय काव्यगौरव पुरस्कार, अष्टपैलू राज्यस्तरीय काव्यभूषण पुरस्कार, अष्टपैलू राज्यस्तरीय साहित्यभूषण पुरस्कार, अष्टपैलू राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार आणि अष्टपैलू राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार असे पुरस्कार दरवर्षी पात्र स्पर्धा विजेत्यांना सन्मानपूर्वक देण्यात येतात.

अलिबाग शहरातील माजी प्राचार्य, कोमसाप अलिबाग शाखेचे माजी अध्यक्ष, डोंगरे हॉल वाचनालय अलिबागचे माजी कार्यकारणी सदस्य, ज्येष्ठ नागरिक संस्था अलिबागचे कार्यकारणी सदस्य आणि जनमानसात रमणारे कवी अनंत केशव देवघरकर यांनी दिनांक 15/6/2020 रोजी पहिली कविता पाठवून अष्टपैलू साहित्य कला अकादमी मुंबई या संस्थेत स्पर्धक म्हणून भाग घेतला. तेव्हापासून सतत चार वर्षात 48 कवितांनी स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडल्याने त्यांना 48 प्रमाणपत्रे आणि अनुक्रमे अष्टपैलू राज्यस्तरीय काव्यगौरव पुरस्कार, काव्यभूषण पुरस्कार, साहित्य भूषण पुरस्कार आणि यंदा दि. 29/12/24 रोजी देहू येथे भव्य समारंभात विश्वगुरू डॉक्टर मधुसूदन घाणेकर यांच्या हस्ते शाल, पदक आणि संस्थेचा न्यायप्रभात अंक देऊन साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तसेच भाई जगताप मित्र मंडळ रायगड, माजी आमदार स्व. मधुकर ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट अलिबाग, ॲड. उमेश ठाकूर मित्र मंडळ संस्थेतर्फे दि. 3/1/25 रोजी कवी अनंत देवघरकर ह्या़ंना ‘कुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार 2025’ने गौरवण्यात आले. अनंत देवघरकर यांनी पाच दिवसात 2 पुरस्कार प्राप्त केल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
