अनंत नारंगीकर
उरण : जासई-दास्तान फाटा येथे १९८४ साली शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी झालेल्या व देशभरात गाजलेल्या आंदोलनात पाच शेतकऱ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.मात्र त्यानंतर ४१ वर्षांचा काळावधी लोटल्या नंतरही शेतकरी, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न जैसे थे आहेत. त्यामुळे शेतकरी, प्रकल्पग्रस्त, भुमीपुत्रांचे पुनर्वसन, रोजगाराचे प्रश्न मार्गी लावणे हीच आंदोलनातील हुतात्मे आणि दिवंगत नेते माजी खासदार दि. बा. पाटील यांच्यासाठी खरी आदरांजली ठरेल असे विचार मान्यवरांनी गुरुवारी (दि. १६) आयोजित करण्यात आलेल्या हुतात्म्यांच्या अभिवादन सोहळ्याप्रसंगी व्यक्त केले. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवीमुंबई शहरात एका कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असताना सिडको स्थानिकांच्या घरावर कारवाई करत असेल तर ते निषेधार्थ असल्याची खंत दिबांचे सुपुत्र अतुल पाटील यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

नवीमुंबई वसविण्यासाठी सिडकोने कवडीमोल भावाने जमिनी संपादित करण्यासाठी सुरुवात केली होती. संपादन जमिनीला विरोध करताना शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य मोबदला मिळावा यासाठी जानेवारी १९८४ साली शेतकऱ्यांचे आंदोलन झाले. दिबांच्या मार्गदर्शनाखाली दास्तान व नवघर येथे हजारोंच्या संख्येने जमलेल्या शेतकरी आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात नामदेव शंकर घरत (चिर्ले), रघुनाथ अर्जुन ठाकूर (धुतुम), कमलाकर कृष्णा तांडेल तसेच महादेव हिरा पाटील व केशव महादेव पाटील (पागोटे) यांनी बलिदान दिले. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी हौतात्म्य पत्करलेल्या पाचही हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी १६ जानेवारी रोजी जासईत तर १७ जानेवारी रोजी पागोटे येथे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी गुरुवारी (दि. १६) जासई येथील हुतात्मा स्मारकात सर्वपक्षीय अभिवादन सोहळा पार पडला. या अभिवादन सोहळ्याप्रसंगी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, लोकनेते तथा माजी खासदार रामशेठ ठाकूर, खासदार श्रीरंग बारणे, आ. महेश बालदी,आ. प्रशांत ठाकूर,आ. विक्रांत पाटील, माजी खासदार तथा माजी महापौर संजीव नाईक, माजी आमदार मनोहरशेठ भोईर, माजी आमदार बाळाराम पाटील, कामगार नेते महेंद्र घरत, कामगार नेते भूषण पाटील, माजी पनवेल नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, जेएनपीए कामगार विश्वस्त दिनेश पाटील,र वींद्र पाटील, दिबा पुत्र अतुल पाटील, माजी सभापती नरेश घरत, प्रदेश सरचिटणीस संतोष घरत, जगदीश गायकवाड, प्रितम म्हात्रे, परेश ठाकूर, शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल भगत, सीमा घरत, भावनाताई घाणेकर, सरपंच संतोष घरत, वाय. टी. देशमुख, माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, चंद्रकांत घरत, तहसीलदार डॉ. उध्दव कदम, सरपंच सुचिता प्रेमनाथ ठाकूर, कामगार नेते सुरेश पाटील, सामाजिक कार्यकर्त्या हेमलता पाटील, आजी-माजी सरपंच, उपसरपंच आदि मान्यवरांसह नागरिक उपस्थित होते. यावेळी हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहून अभिवादन करण्यात आले तसेच लोकनेते दिबांच्या पुतळ्यास वनमंत्री गणेश नाईक यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी पनवेल येथील महात्मा फुले महाविद्यालयातील एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी हुतात्म्यांना मानवंदना दिली.

यावेळी उपस्थित विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहताना मनोगतातून शेतकरी, प्रकल्पग्रस्त, भुमीपुत्रांचे पुनर्वसन, रोजगाराचे प्रश्न मार्गी लावणे तसेच नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे हीच आंदोलनातील हुतात्मे आणि दिवंगत नेते माजी खासदार दि. बा. पाटील यांच्यासाठी खरी आदरांजली ठरेल. त्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रितपणे काम करण्याचेही आवाहन करण्यात आले.
नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नव्हे यापुढे लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ अशीच ओळख सदर विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी ओळखले जाणार आहे .तसेच प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी शासनस्तरावर पुढाकार घेणार असून यापुढे कोणालाही संघर्ष करण्याची वेळ येणार नाही असा विश्वास राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी उपस्थितांना देऊन हुतात्म्यांना तसेच प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते दि. बा. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.
स्थानिक, प्रकल्पग्रस्तांनी समाजहिताची कामे करण्यास सुरुवात केल्यावर त्याठिकाणी सीआरझेड येत असेल तर ते निषेधार्थ असल्याची खंत लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी हुतात्म्यांना अभिवादन करताना व्यक्त केली. तसेच या परिसरातील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार निश्चित पुढाकार घेणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला.
