रायगड : पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावले यांना डावलून आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रीपद देण्यात आलं. त्यामुळे रायगडमधील शिवसैनिक संतप्त झालेत. मुंबई गोवा महामार्गावर महाड जवळ रात्री उशिरा शिवसैनिकांनी रस्त्यावर टायर जाळून याचा निषेध केला. गोगावले यांचा जयजयकार करीत खासदार सुनील तटकरे यांचा निषेध करण्यात आला. शिवसैनिकांनी जवळपास २ तास महामार्ग रोखून धरला. पोलिसांनी हस्तक्षेप करीत शिवसैनिकांना बाजूला केलं आणि वाहतूक सुरळीत केली. सुनील तटकरे यांनी गोगावले यांच्या पाठीत खंजीर खुपसला, अशी संतप्त भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली. आजदेखील याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
रायगडचे पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांना दिल्यानंतर या निर्णयाचे तीव्र पडसाद रायगडमध्ये उमटले. शिवसैनिकांकडून या निर्णयानंतर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. जवळपास दोन तास मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक शिवसैनिकांनी रोखून धरली.यावर आता मंत्री भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या सहाच्या सहा आमदारांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना कळवलं होतं. सर्वांना भेटी घेऊन सांगितलं. त्यानंतर जिल्ह्यातही वातावरण झालं होतं की पालकमंत्री भरत गोगावले व्हावेत. आता जो निकाल आलाय तो अनपेक्षित आहे. पण ठीक आहे. आमचे नेते एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य करावा लागेल.
गेल्या टर्मपासून भरत गोगावले यांना गुंगारा दिला जात आहे. मागच्या सरकारच्या काळात एकाही मंत्रिमंडळ विस्तारात भरत गोगावलेंना मंत्रिपद दिलं नव्हतं. परंतु, त्यांना मंत्रिपदाची आस होती. मात्र, नव्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले. परंतु त्यांना ज्या पालकमंत्री पदाची आस्था होती, ते पद देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांच्यासह त्यांचे समर्थक नाराज होणं स्वाभाविक आहे.
